इस्लामपूरमध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या उद्घाटन सोहळ्यात अजित पवार आणि रोहित पवार यांची रंगतदार शाब्दिक जुगलबंदी रंगली.
महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा त्यांच्या रोखठोक शैलीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. यावेळी त्यांच्या निशाण्यावर होते त्यांचेच पुतणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार. इस्लामपूर येथील एका कार्यक्रमात काका-पुतण्याच्या शाब्दिक चकमकीने राजकीय रंगमंचावर चांगलाच रंग भरला. रोहित यांनी अजित पवारांना ‘भावकी विसरले’ असा टोला लगावला, तर अजित पवारांनीही ‘भावकीमुळेच तू आमदार झालास’ असा सणसणीत प्रत्युत्तर देत पलटवार केला. या राजकीय जुगलबंदीने उपस्थितांना हसवले आणि विचारही करायला भाग पाडले.
16 ऑगस्ट रोजी इस्लामपूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अजित पवार आणि रोहित पवार एकाच व्यासपीठावर आले. पण हा कार्यक्रम केवळ उद्घाटनापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो एका राजकीय ‘टोला-टोला’ सामन्याचा रंगमंच ठरला. रोहित पवार यांनी आपल्या भाषणात अजित पवारांवर फटकेबाजी करत ‘दादा गावकीचा विचार करतात, पण भावकी विसरले’ असा टोमणा मारला.
राजकीय हास्याचा गडगडाट
अजित पवारही यावर शांत कसे राहणार? त्यांनीही व्यासपीठावर येताच रोहित पवारांना खणखणीत उत्तर दिले आणि उपस्थितांमध्ये हशा पिकवला.अजित पवार यांनी रोहित पवारांच्या टोमण्याला उत्तर देताना थेट भावकीचा उल्लेख केला. रोहित म्हणाला, दादा गावकीकडे बघतात, पण भावकीकडे नाही. अरे, भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास असे म्हणत त्यांनी रोहित पवारांना चांगलाच टोला लगावला. इतकेच नाही, तर मी महायुतीत गेल्यापासून तुमच्या कुणावर टीका केली आहे का? तुम्ही तुमच्या विचाराने चालताय, मी माझ्या विचाराने चाललोय, असे सांगत ‘माझ्या नादाला लागू नका’ असा हसत-हसत इशारा दिला.
अजित पवार यांनी शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेत कोणतीही तडजोड न केल्याचा दावाही केला.या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही आपल्या खास शैलीत अजित पवारांना अप्रत्यक्ष टोमणा मारला. वाळवा तालुका सहजासहजी वाकत नाही, असे म्हणत त्यांनी उपस्थितांना विचार करायला लावले. यावर अजित पवारांनीही मिश्कीलपणे प्रत्युत्तर दिले. जयंत पाटील म्हणजे देखणे नेतृत्व. आम्ही काय कमी देखणे आहोत का? वाळव्यात बोलवायचं आणि आमचीच बिन पाण्याने करायची असे म्हणत त्यांनी उपस्थितांमध्ये हास्याचा गडगडाट उडवला. या शाब्दिक चकमकीने कार्यक्रमाला राजकीय रंग तर आलाच, पण काका-पुतण्यातील नात्याची एक वेगळीच झलकही दिसली.
Vijay Wadettiwar : स्वातंत्र्य दिनी जालन्यात पोलिसांची माजोरडी मॅजिक
