अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक सातत्याने लाईमलाईटमध्ये आहेत. सोशल मीडियापासून ते अकोल्याच्या गल्लीबोळापर्यंत त्यांचे नाव प्रत्येकाच्या तोंडावर आहे.
महाराष्ट्रात सणांची धामधूम सुरू आहे. गणेश चतुर्थी, ईद, नवरात्र, यांसारखे उत्सव एकामागून एक येत आहेत. दिवाळीही आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या सर्व उत्सवांच्या गर्दीत, फटाक्यांच्या आवाजात आणि गजरात सामान्य नागरिक निश्चिंतपणे आनंद लुटत आहेत. याचे श्रेय जाते महाराष्ट्र पोलिसांना. जे अहोरात्र प्रयत्न करून कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून सजग असतात. विशेषतः अकोला जिल्ह्यात नवे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आपल्या कार्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अकोला सुरक्षित आणि शांत राहिला आहे. ज्यामुळे ते लाईमलाइटमध्ये येत आहेत. अर्चित चांडक यांनी अकोल्याचा पदभार स्वीकारल्यापासून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ते अथक प्रयत्न करत आहेत. गुन्हेगारांना पकडणे, दंगली रोखणे आणि सामाजिक शांतता राखणे यासाठी त्यांनी विशेष योजना राबवल्या.
गणेशोत्सवात त्यांच्या सतर्कतेचे कौतुक झाले, ईदच्या मिरवणुकीत तर नागरिकांनी थेट त्यांच्या नावाचे नारे लावले. ‘अकोल्याचे रक्षक अर्चित चांडक’ असे घोषित करून लोकांनी त्यांना देवदूतासारखे मानले. तरुण वर्गात तर ते प्रेरणास्थळ बनले आहेत. सणांच्या काळात अनर्थ टाळण्यासाठी त्यांनी विशेष फौज तैनात केली. ज्यामुळे अकोला त्यांच्या कुशीत सामावून गेला आहे.गणेशोत्सव, ईद आणि नवरात्र यांसारख्या सणांमध्ये अर्चित चांडक यांचे नाव गाजले. त्यांनी सुरक्षेची जबाबदारी इतक्या कुशलतेने निभावली की, अकोल्याची जनता त्यांना ‘देव माणूस’ म्हणून बघू लागली. नुकताच दुर्गा उत्सव पार पडला. दुर्गादेवीच्या विसर्जनाच्या दिवशी पातुर नंदापूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक नवदुर्गा उत्सव मंडळाने तर थेट अर्चित चांडक यांचे बॅनर लावले. त्यांचे पोस्टर आणि बॅनर शहरभर झळकले. ज्यात ‘माणूस उभा आहे वर्दीतला, म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला’ असे घोषवाक्य होते.
वर्दीतला मानवतेचा आदर्श
‘नऊ दिवस नऊ रंग, खाकी मात्र बंदोबस्तात दंग’ अशा वाक्यांनी अकोल्यात आनंदाची लहर पसरली. अकोला हे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. ज्यात दसरा, दिवाळी, ईद, रमजान, गणेशोत्सव यांसारख्या सणांमध्ये पोलिसांची कसोटी लागते. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजात शांतता कायम राहावी यासाठी पोलीस डोळ्यात तेल घालून काम करतात. मात्र, समाजाकडून त्यांची ही सेवा अनेकदा दुर्लक्षित राहते. संचारबंदी असो की खून, मारामारी किंवा जातीय दंगल, अशा वेळी पहिले लक्ष्य पोलीसच ठरतात. समाजाकडून होणाऱ्या आरोप आणि टीकेकडे दुर्लक्ष करून ते सामाजिक सलोखा राखण्यासाठी धडपडतात. यावेळी कुटुंबाला वेळ देणेही शक्य होत नाही. नेमून दिलेले काम आणि ठिकाणच त्यांचे कुटुंब बनते. गणेशोत्सव आणि ईदच्या मिरवणुकीत अर्चित चांडक यांचे नारे लावले गेले.
सोशल मीडियापासून ते अकोल्याच्या रस्त्यांपर्यंत त्यांचे नाव गाजत होते. तरुणांनी सोशल मीडियावर त्यांना प्रचंड पाठिंबा दिला. आता नवरात्रीत बॅनर लावून एक नवीन उत्साह निर्माण झाला. यामुळे अर्चित चांडक हे अकोल्याला ‘कुशीत’ घेऊन सुरक्षित ठेवणारे एसपी म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. त्यांच्या कार्याने गुन्हेगारी कमी झाली आणि सण साजरे होण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. अकोल्यातील नागरिक म्हणतात, अर्चित चांडक सारखे एसपी लाभणे ही आमची लॉटरी लागण्यासारखे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी केलेल्या मेहनतीमुळे सणांचा जल्लोष निर्भय झाला आहे. मात्र, हे सर्व पाहता एक गोष्ट लक्षात येते की, पोलिस हे केवळ वर्दीतील माणसे नाहीत, ते समाजाचे खरे रक्षक आहेत. त्यांची सेवा ओळखून समाजाने त्यांचे कौतुक करणे गरजेचे आहे.
Harshwardhan Sapkal : मोटाभाई आले पण शेतकरी उपेक्षितच राहिले
