महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची गती वाढली आहे. दिवाळीपूर्वी पूर्व विदर्भात सतत मोठे राजकीय बदल पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या निवडणुकींचा धुमाकूळ सुरू आहे. पक्षांतर, बैठक सत्र आणि रणनीतींची आखणी यामुळे वातावरण तापलेले आहे. दिवाळी हा सण देखील जवळ येत आहे. यातच राजकारणातही मोठे फटाके फुटताना दिसत आहे. विशेषतः पूर्व विदर्भात हे बदलांचे वारे वेगाने वाहत आहेत. काही महिन्यांपूर्वी भंडारा जिल्ह्यात पालकमंत्री बदलाची सुरुवात झाली होती. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी भंडाऱ्याचे पालकमंत्री पद सोडले. त्यांच्या जागी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची निवड झाली. पंकज भोयर हे वर्धेचेही पालकमंत्री आहेत. ज्यानंतर त्यांना भंडाऱ्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली.
हे बदल इतक्यात संपले नव्हते, की आता गोंदिया जिल्ह्यातही असाच धक्कादायक बदल घडला आहे. गोंदियाचे पालकमंत्री असलेले राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अचानक पद सोडले. तब्येतीचे कारण देत त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पाटील यांच्या गुडघ्याचे नुकतेच ऑपरेशन झाले आहे. लांबचा प्रवास त्यांना त्रासदायक ठरतो, असे ते म्हणतात. मात्र, या निर्णयामागे राजकीय कारणेही असू शकतात. काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात खासदार प्रफुल पटेल यांनी पालकमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. पालकमंत्री जिल्ह्यात येतच नाहीत, फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला दर्शन देतात, असे प्रफुल पटेल म्हणाले होते.
राजकीय समीकरणात बदल
पटेल यांनी पालकमंत्र्यांना जिल्ह्यातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याचीही सूचना केली. ही टीका पाटील यांच्या निर्णयावर प्रकाश टाकते का, याबाबत चर्चा रंगल्या आहेत. पाटील यांच्या राजीनाम्यानंतर गोंदियाचे नवे पालकमंत्री म्हणून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते तथा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची निवड झाली आहे. अजित पवार यांच्या वरळीतील जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. नाईक हे विदर्भातीलच मंत्री असल्याने त्यांना गोंदियाला जाणे सोयीस्कर ठरेल, असे अजित पवारांच्या वतीने सांगण्यात आले. पालकमंत्री पद मिळवण्यासाठी अनेक नेते आग्रही असतात, पण पाटील यांनी ते सोडणे हे अनपेक्षित आहे. सुरुवातीला पाटील यांनी स्वतःच्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मागितले होते. पण ते पूर्ण होऊ शकले नव्हते.
हसन मुश्रीफ यांच्यासारखेच पाटील यांच्यातही सुरुवातीपासून नाराजीचा सूर होता. मुश्रीफ यांनीही विदर्भातील एका जिल्ह्याचे पद सोडले होते. आता पाटील यांचा हा निर्णय राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना जन्म देत आहे. या बदलांमुळे पूर्व विदर्भातील राजकारणात नवे समीकरण उदयास येत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे फेरबदल पक्षांच्या रणनीतीचा भाग आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो. गोंदियात नाईक यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील विकासकामांना नवे वळण मिळेल, अशी अपेक्षा आहे. नाईक हे अनुभवी नेते असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न होतील.भंडारा जिल्ह्यातही पालकमंत्री बदलाची लाट आली आहे. संजय सावकारे यांना अचानक पदावरून हटवण्यात आले आणि त्यांच्या जागी पंकज भोयर यांना जबाबदारी देण्यात आली. सावकारे यांना आता बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हे ‘डिमोशन’ का, याबाबतचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
