सोयाबीनच्या हमीभावावरून बच्चू कडूंचा आक्रमक स्वर पुन्हा एकदा गाजला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हरियाणा–पंजाबप्रमाणे लढण्याचे आवाहन करत त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.
महाराष्ट्राच्या मातीत शेतकऱ्यांचा आक्रोश पुन्हा एकदा घुमतोय. सोयाबीनच्या हमीभावासाठी प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी सरकारला थेट आव्हान दिले आहे. शेतकऱ्यांचे हक्क मिळवण्यासाठी त्यांनी भगतसिंग यांच्या क्रांतिकारी लढ्याचा दाखला देत, एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवत, शेतकऱ्यांच्या दुखऱ्या नसेवर हात ठेवणारा हा लढा आता तीव्र होत आहे. जळगावात नुकत्याच झालेल्या जन आक्रोश मोर्चाने या लढ्याला नवे बळ दिले, पण त्याचवेळी राजकीय वादळही निर्माण झाले.
शेतकऱ्यांच्या या संघर्षाला सरकारच्या अनास्थेची किनार लाभली आहे. सोयाबीनला सात हजार रुपये भाव मिळायला हवा, पण चार हजारांवरच व्यवहार होत असल्याने शेतकऱ्यांचे प्रति एकर वीस हजारांचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला जात आहे. बच्चू कडू यांनी सरकारला खड्ड्यात घालणारा प्रश्न उपस्थित केला आहे. जर शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार नसेल, तर सरकार तिथे बसून काय करत आहे? त्यांनी शेतकऱ्यांना एकजुटीने लढण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून जातीपातीच्या भेदात न अडकता, हक्कासाठी भगतसिंगासारखा लढा देता येईल.
Chandrapur : राहुल गांधींच्या बोगस मतदारांचा डाव प्रशासनाने हाणला
जन आक्रोशाचा सूर
जळगावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आयोजित जन आक्रोश मोर्चाने सरकारच्या निष्क्रियतेला आरसा दाखवला. माजी खासदार उन्मेश पाटील आणि बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा काढला. निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी यावे, अशी मागणी होती. मात्र, ही मागणी फेटाळल्यानंतर आंदोलकांनी कार्यालयात प्रवेशाचा प्रयत्न केला. ज्यामुळे गोंधळ उडाला. या घटनेनंतर पोलिसांनी बच्चू कडू, उन्मेश पाटील यांच्यासह अकरा जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बच्चू कडू यांनी 28 ऑक्टोबरला नागपूरला मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. हा लढा केवळ सोयाबीनच्या भावापुरता मर्यादित नसून, शेतकऱ्यांच्या सन्मान आणि स्वाभिमानाचा आहे. सरकारने हमीभाव आणि कर्जमाफी द्यावी, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आपला हक्क मिळवेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या या लढ्याला भगतसिंग यांच्या क्रांतिकारी भावनेची प्रेरणा आहे. जी सरकारच्या अनास्थेला भेदण्यासाठी पुरेशी आहे.