
निवडणूक आयोगाकडून 25 जानेवारीचा दिवस मतदाता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशाी काँग्रेस राज्यभरात आंदोलन करणार आहे.
मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदाता दिवस साजरा करण्यात येतो. 25 जानेवारीला हा दिवस असतो. या दिवसाला काँग्रेसकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. टिळक भवन येथे बोलताना, पटोले म्हणाले की प्रत्येक तालुका पातळीवर हे आंदोलन करण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत निवडणूक आयोग आणि भाजपनं एकत्र येत लोकशाहीचा खून केल्याचं पटोले म्हणाले. लोकशाहीचा गळा यंदाच्या निवडणुकीत दाबण्यात आला. निवडणूक आयोगानं आमच्या कोणत्याही प्रश्नाची उत्तरं दिली नाहीत. याउलट लोकसभेत गोंधळ निर्माण करण्यात आला. या गोंधळाच्या वातावरणात काही कायदे पारीत करण्यात आले. पारदर्शकतेच्या नावाखाली हे सगळं सुरू असल्याचं पटोले म्हणाले.
चार महिन्यात 50 लाख मतं राज्यात वाढविण्यात आली. याची माहिती निवडणूक आयोगानं दिलेली नाही. त्यामुळं निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांसाठी काम करीत असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली. निवडणूक आयोग हा प्रकार करीत असल्यानं यंदा 25 जानेवारीला आंदोलन करण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतल्याचं पटोले म्हणाले. महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आंदोलन केलं जाईल. जिल्हास्तरावर जिल्हाध्यक्ष आंदोलनाचं नेतृत्व करतील. तालुकास्तरावर तालुकाध्यक्ष आंदोलनात सहभागी होतील, असंही पटोले यांनी सांगितलं.

संताप कायम
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीनं ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. हे आंदोलन कायम राहणार असल्याचं पटोले म्हणाले. या सर्व आंदोलनात गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे नेते सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील सरकार बेईमानीनं निवडणून आलं आहे. सरकारला किंमत नाही. बहुमत मिळाल्यानंतरही महायुतीला सत्ता स्थापन करता आली नाही. सत्ता स्थापन झाल्यानंतर कॅबिनेटचा विस्तार अडवून ठेवला. विस्तार झाल्यानंतर पालकमंत्री पदाचा निर्णय झाला नाही. अद्यापही हा घोळ सुरू असल्याची टीका पटोले यांनी केली. महायुतीचं सरकार जनतेसाठी नाही. मलाईदार खाती हवी म्हणून हा विलंब करण्यात आल्याचं पटोले म्हणाले.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्द्यांना सरकारनं बगल दिली. बीड जिल्ह्यात गुंडगिरी सुरू आहे. मात्र सरकारनं त्यावर उत्तर दिलं नाही. सरकारमधील मंत्री या गुंडगिरीला खतपाणी घातल आहेत. अनेक मोक्याचे भूखंड घशात घालण्यात आलेत. विम्याच्या रकमेत भ्रष्टाचार करण्यात आला. नरेंद्र मोदी यांच्या मित्रांच्या या विमा कंपन्या आहेत. विम्याच्या रकमेतून शेतकऱ्यांची रक्कम हडपण्यात आली, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली. जनाची नाही तर मनाची लाज सरकारनं ठेवावी, असा संतापही पटोले यांनी व्यक्त केला. राज्यातील मुख्यमंत्र्यांनी दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती देणं हे लाज आणणारं असल्याची टीकाही पटोले यांनी केली आहे.