17 सप्टेंबर 2025 रोजी भाजप सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वाढदिवस, 17 सप्टेंबर 2025 रोजी, भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि त्यांच्या मित्र पक्षांकडून थाटामाटात साजरा केला जात आहे. यासोबतच मोदी सरकारच्या नेतृत्वात अकरा वर्षे पूर्ण झाल्याने पक्षात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सर्वत्र मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, सोशल मीडियापासून ते राजकीय व्यासपीठांपर्यंत, त्यांच्या समर्थकांनी ‘मोदी है तो मुमकिन है’ अशा घोषणा देऊन वातावरण उजळून टाकले आहे. मात्र, हा उत्सव फक्त उत्साहाचा नाही, तर विरोधकांच्या तीव्र टीकेचाही भाग बनला आहे. मोदींच्या 75 वर्षी ते पंतप्रधान पदाचा राजीनामा देतील का, असे प्रश्न विरोधी पक्षांकडून उपस्थित होत आहेत. अशा पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. ज्याने या वाढदिवसाला एक राजकीय रंग दिला आहे.
ठाकूर यांच्या मते, मोदींचा कार्यकाळ हा देशासाठी एक अस्वस्थ दशकाचा काळ आहे. 2014 मध्ये ‘अबकी बार मोदी सरकार’ म्हणत सत्तेत आलेल्या भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवले. त्यावेळी दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले गेले. ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’, ‘स्किल इंडिया‘ अशा योजना जाहीर झाल्या. भव्य इव्हेंट झाले. जाहिरातींचा धुमाकूळ घातला गेला. पण वास्तवात काय? देशातील 83 टक्के युवक आजही बेरोजगार आहेत, हाताला काम नाही. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि निर्णयांमुळे रोजगाराची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि कोविड काळातील लॉकडाऊन यांचा सर्वाधिक फटका लघु उद्योग आणि सेवा क्षेत्राला बसला. हे क्षेत्रच रोजगाराचे मुख्य स्रोत असतात, पण ते आता डळमळीत झाले आहेत.
आर्थिक संकट
भारताकडे जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आहे. तरीही शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रांत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असे ठाकूर यांनी सांगितले. मागील दशकात बेरोजगारी कमी होण्याऐवजी वाढलीच आहे. विशेषतः महिलांमधील बेरोजगारी चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. आकडेवारी सांगते की, मोदी सरकारच्या घोषणा आणि प्रत्यक्ष रोजगार निर्मिती यात प्रचंड तफावत आहे. आजची तरुण पिढी अस्वस्थ आहे. युवक आणि महिलांना पुरेसे रोजगार मिळत नाहीत. हा ‘नवा भारत’ खरंच अस्वस्थ भारत आहे, जिथे स्वप्ने फुलण्याऐवजी कुजत आहेत. या टीकेला एक सर्जनशील वळण देताना, ठाकूर यांनी मोदी सरकारला एका भव्य मिरवणुकशी तुलना केली. ज्यात फटाके फुटतात, घोषणा होतात, पण शेवटी रस्त्यावर फक्त राख आणि कचरा उरतो.
2014 पासून सुरू झालेल्या या ‘मोदी युगात’ अर्थव्यवस्था जणू एका रोलर कोस्टरवर आहे. वरती जाण्याचे आश्वासन, पण प्रत्यक्षात खोल खड्ड्यात. नोटबंदी ही तर एका रात्रीत घडलेली ‘आर्थिक भूकंप’ होती. ज्याने लाखो छोट्या व्यावसायिकांना उद्ध्वस्त केले. जीएसटीने व्यवसायांना सोपे करण्याऐवजी गुंतागुंत वाढवली आणि कोविड लॉकडाऊनने तर अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले. हे सर्व निर्णय जणू एका कलाकाराने रंगवलेल्या चित्रासारखे. दूरून सुंदर दिसतात, पण जवळून पाहिले की रंग फिके आणि त्रुटी उघड्या होतात. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या उत्सवातही हे प्रश्न गाजत आहेत. भाजपने देशभर कार्यक्रम आयोजित केले आहेत. रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण आणि सामाजिक सेवा. पण विरोधक हे सर्व ‘शोबाजी‘ म्हणून हिणवत आहेत. ठाकूर यांच्या शब्दांत, मोदी सरकारने तरुणांना रोजगार देण्याऐवजी फक्त ‘इव्हेंट मॅनेजमेंट‘ शिकवले आहे.
Eknath Shinde : महायुतीच्या यशोगाथेची पुनरावृत्ती स्थानिक स्वराज्यात रंगणार
सामाजिक असमतोलाची वाढ
महिलांच्या बेरोजगारीवर बोलताना त्या म्हणाल्या, की हे सरकार ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ म्हणते, पण प्रत्यक्षात ‘बेटी बेरोजगार’ करत आहे. आकडेवारीनुसार, ग्रामीण भागातील महिलांची रोजगार दर 2014 पासून 30 टक्क्यांनी घसरला आहे. ज्याने सामाजिक असमतोल वाढवला आहे.या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदींच्या 75 वाढदिवसाला एक वेगळा अर्थ प्राप्त होत आहे. एकीकडे समर्थक त्यांना ‘विश्वगुरू’ म्हणून साजरा करत आहेत. तर दुसरीकडे विरोधक ‘अस्वस्थ दशक’ म्हणून टीका करत आहेत. भारताची तरुण लोकसंख्या ही एक मोठी संपत्ती आहे. पण तिला योग्य दिशा देण्यात सरकार कमी पडले आहे. ‘स्किल इंडिया’ योजनेच्या नावाने अनेक केंद्रे उघडली. पण त्यांच्यातून निघणारे तरुण आजही नोकरीसाठी धडपडत आहेत.
