मूर्तिजापूर तालुक्यात ऑगस्ट 2025 मधील ढगफुटीसदृश पावसाने खरीप हंगाम उद्ध्वस्त करून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने तात्काळ मदत, पंचनामे व विशेष पॅकेजची ठाम मागणी केली आहे.
मूर्तिजापूर तालुक्यात 16 ते 18 ऑगस्ट 2025 या कालावधीत ढगफुटीसदृश पावसाने थैमान घातले. या प्रलयकारी पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात बुडवल्या आहेत. खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने शेतजमिनी उद्ध्वस्त झाल्या. शेतकरी आर्थिक संकटाच्या गर्तेत लोटला गेला आहे. या संकटाने शेतकऱ्यांचे मनोधैर्य खचले आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वंचित बहुजन आघाडीने शेतकऱ्यांच्या या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधत, उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक साहाय्य मिळावे, यासाठी आघाडीने आग्रही भूमिका घेतली आहे. शासनाने अद्याप नुकसानभरपाई किंवा सर्वेक्षणाची कोणतीही ठोस कार्यवाही हाती घेतलेली नाही, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे आघाडीने नमूद केले आहे.
Unpaid Salary Issue : शिक्षक कर्तव्यात फुल अधिकारी पण बिनपगारी
आर्थिक मदतीची गरज
ढगफुटीच्या पावसाने मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सोयाबीन, कापूस, तूर यांसारखी खरीप पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. वंचित बहुजन आघाडीने शासनाला तातडीने पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. पंचनाम्याच्या प्रक्रियेत कोणताही विलंब शेतकऱ्यांना आणखी संकटात ढकलू शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करणे आवश्यक आहे, असे आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
वंचित बहुजन आघाडीने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक पुनर्वसन आणि त्यांच्या पिकांचे संरक्षण यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी आघाडीची अपेक्षा आहे. शेतकरीहितासाठी सतत लढणारी वंचित बहुजन आघाडी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी आघाडी कायम पुढाकार घेते, असे आघाडीच्या नेत्यांनी ठामपणे सांगितले आहे.
आंदोलनाचा इशारा
शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. शेतकऱ्यांना तात्काळ न्याय मिळाला नाही, तर आघाडी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा देण्यास तयार आहे. शेतकऱ्यांचे हीत आणि त्यांचे संरक्षण ही आघाडीची प्राथमिकता आहे. या संकटकाळात शेतकऱ्यांना एकटे सोडता कामा नये, यासाठी आघाडी शासनावर दबाव निर्माण करत आहे. शेतकऱ्यांच्या या लढ्यात वंचित बहुजन आघाडी त्यांचा आवाज बनून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे.