महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी एकनाथ शिंदे गटाने चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.
विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीकडून या पाच जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यात येत आहेत. आतापर्यंत भाजपकडून तीन नाव जाहीर करण्यात आले आहेत. विशेषतः शिवसेना शिंदे गटाकडून नंदुरबार जिल्ह्यातील आक्रमक आणि प्रभावी नेता चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. द लोकहित लाईव्हने सगळ्यात आधी सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठी भूमिका बजावली होती.
अक्कलकुवा मतदारसंघातून त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमश्या पाडवी विजयी झाले होते. त्यामुळे आता विधान परिषदेसाठी त्यांची वर्णी लावण्यात आली आहे. चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेत संधी मिळाल्याने त्यांचे समर्थकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान धडगाव येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान परिषदेत संधी देण्याचे आश्वासन दिले होते. शिंदेंनी आपला शब्द पूर्ण करीत त्यांचे नाव निश्चित केले आहे.
महायुतीचा विजय निश्चित
विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी 27 मार्चला पोटनिवडणूक होणार आहे. महायुतीकडे विधानसभेत 237 आमदारांचे संख्याबळ आहे, त्यामुळे या पाचही जागांवर महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यापैकी तीन जागा भाजपकडे जात आहे. प्रत्येकी एक जागा शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहे. भाजपने आधीच आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे, आता शिवसेनेनेही आपला उमेदवार निश्चित केलेला आहे.
चंद्रकांत रघुवंशी यांचा नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे विधान परिषदेवर त्यांची निवड झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठा फायदा होईल, असा अंदाज आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. शिवसेना (शिंदे गट) कडून त्यांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी तिकडे रवाना झाल्याचीही माहिती मिळाली आहे.
Vijay Wadettiwar : बजरंग दल आणि विहिंपला काहीच काम उरलं नाही
यापूर्वीचा अनुभव
चंद्रकांत रघुवंशी यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांना आमदारकीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता शिंदे आपल्या शब्दाला जागतील, असा विश्वास रघुवंशी यांच्या समर्थकांना आहे. याआधीही ते विधान परिषदेत सदस्य राहिले आहेत. त्यामुळे त्यांचा अनुभव आणि राजकीय प्रभाव लक्षात घेता, त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
