गडचिरोलीच्या जंगलात दडलेली माओवादी स्मारके अखेर पोलिसांच्या धाडसी कारवाईत इतिहासजमा झाली. या निर्णायक मोहिमेने भयाचे प्रतीक नष्ट करून नागरिकांच्या मनात सुरक्षिततेचा आणि शांततेचा नवा विश्वास प्रज्वलित केला.
गडचिरोलीच्या घनदाट जंगलात, माओवाद्यांनी उभारलेली दहशतीची स्मारके आता इतिहासजमा झाली आहेत. गडचिरोली पोलीस दलाने आपल्या निर्भय आणि धडाकेबाज कारवाईने माओवाद्यांच्या हिंसक भूतकाळाला मातीमोल करून शांततेचा नवा संदेश पेरला आहे. मौजा कटेझरी आणि मर्मा जंगल परिसरात लपलेली ही स्मारके नष्ट करून पोलिसांनी केवळ भयाचे प्रतीकच उद्ध्वस्त केले नाही. तर स्थानिकांच्या मनात सुरक्षिततेची ज्योत प्रज्वलित केली. या अभियानाने गडचिरोलीच्या दुर्गम भागात आशेचा किरण पसरवला आहे.
गडचिरोली पोलीस आणि एसआरपीएफच्या जवानांनी 30 सप्टेंबरला एकत्रितपणे जंगलात शोधमोहीम राबवली. या अभियानादरम्यान, त्यांना दोन ते तीन वर्षांपूर्वी माओवाद्यांनी उभारलेली दोन स्मारके आढळली. ही स्मारके माओवाद्यांच्या क्रूर विचारसरणीचे आणि दहशतीचे प्रतीक होती. जी स्थानिकांना भयग्रस्त ठेवण्यासाठी उभारली गेली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बीडीडीएस पथकाने स्मारकांची तपासणी केली. ती पूर्णपणे उद्ध्वस्त केली. या कारवाईने माओवाद्यांचा दबदबा खिळखिळा झाला. गावकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला.
माओवादाला ठोस प्रत्युत्तर
स्मारके नष्ट करून गडचिरोली पोलिसांनी थांबले नाहीत. त्यांनी त्या जागी शांततेचे प्रतीक म्हणून वृक्षारोपण केले. ज्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेशही पसरला. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने ही कारवाई यशस्वी झाली. ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये एकजुटीची भावना दृढ झाली. माओवाद्यांच्या खोट्या प्रचाराला आणि भुलथापांना पूर्णविराम देण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले. या अभियानाने दहशतीच्या सावटाखालील गावांना मुक्तीचा श्वास मिळाला आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली.
Harshwardhan Sapkal : ये सरकार हमसे डरती है, पुलिसको आगे करती है
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी झाली. त्यांनी ठामपणे सांगितले की, माओवाद्यांच्या दहशतीपासून नागरिकांना मुक्त करण्यासाठी गडचिरोली पोलीस कटिबद्ध आहेत. अशा बेकायदेशीर स्मारकांना समाजात स्थान नाही, असे आवाहन त्यांनी केले. अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, सत्य साई कार्तिक, गोकुल राज आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले आणि कुणाल भारती यांनी जवानांसह ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. गडचिरोली पोलिसांचा हा विजय शांतता आणि विकासाच्या दिशेने टाकलेले एक दमदार पाऊल आहे.
