यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दारव्हा तालुक्यात नागरिकांच्या तक्रारी आणि विकासकामांचा थेट आढावा घेतला.
यवतमाळ जिल्ह्याच्या मातीत रुजलेले आणि जनतेच्या हृदयात स्थान मिळवलेले पालकमंत्री संजय राठोड यांनी पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सहा वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष प्रभाग रचनेनंतर रणनीती आखण्यात व्यग्र आहे. संजय राठोड यांनी मात्र आपले लक्ष जिल्ह्यातील जनतेच्या समस्यांकडे वळवले.
दारव्हा तालुक्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत त्या तातडीने सोडवण्याचा विडा उचलला. यवतमाळच्या प्रत्येक गावाला आपल्या कुशीत सामावून घेणाऱ्या या नेत्यांनी आपल्या कार्यशैलीने सर्वांचे मन जिंकले. पण संजय राठोड यांनी निवडणुकीच्या गदारोळातही जनतेच्या समस्या प्राधान्याने हाताळल्या. दारव्हा येथील बैठकीत त्यांनी ऑनलाइन तक्रारींचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निराकरणाचे आदेश दिले. यावेळी तालुक्यातील विकासकामांवरही सविस्तर चर्चा झाली. ज्यामुळे राठोड यांच्या दूरदृष्टीचे दर्शन घडले.
प्रशासनातून त्वरित कारवाई
दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित दुसऱ्या आढावा बैठकीत राठोड यांनी आरोग्य सेवांवर विशेष लक्ष केंद्रित केले. रुग्णालयातील सुविधांचा सखोल आढावा घेत त्यांनी नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी सुधारणांचा आग्रह धरला. कर्मचाऱ्यांनी तत्परतेने सेवा द्यावी, याची खबरदारी घेण्याचे निर्देश देत त्यांनी रुग्णांच्या सोयीसाठी सकारात्मक उपाययोजनांचा निर्णय घेतला. या बैठकीत उपसंचालक आरोग्य मंडळ अकोला डॉ. सुशीलकुमार वाघचोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
राठोड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत दारव्हा तालुक्यातील विकासकामांना गती देण्यावरही भर देण्यात आला. जलसंधारण, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग यासारख्या खात्यांच्या अधिकाऱ्यांना विकासकामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले. उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी, तहसीलदार रवी काळे, नगरपरिषद मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत पवार आणि तालुकाप्रमुख मनोज सिंगी हे या बैठकीत उपस्थित होते. राठोड यांनी प्रत्येक समस्येला थेट भिडत ती सोडवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये समाधानाची भावना पसरली.
संजय राठोड यांनी आपल्या कार्यकाळात यवतमाळ जिल्ह्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. निवडणुकीच्या धामधमीतही त्यांनी जनतेच्या समस्यांकडे लक्ष देऊन आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या या बैठकीतून दारव्हा तालुक्यातील नागरिकांना केवळ आश्वासने नाही, तर प्रत्यक्ष कृतीचा अनुभव मिळाला. विकासकामे आणि आरोग्यसेवा यांना गती देण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार यवतमाळच्या जनतेसाठी आशेचा किरण ठरला आहे.
