
जुना भंडारा रोडच्या रुंदीकरणासाठी 52.80 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता, पण दीड वर्षांत केवळ 150 मीटरच काम पूर्ण झाले.
शहरातील रस्ते कामांच्या संथ गतीबद्दल नागरिक आधीच नाराज आहेत. मात्र जुना भंडारा रोडचे रुंदीकरण तर थेट थट्टेचा विषय बनला आहे. तब्बल दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कामाचा वेग पाहता, नागपूरच्या विकासाचे स्वप्न हे केवळ सरकारी फायलींमध्येच अडकले आहे, असे म्हणावेसे वाटते.
तब्बल 52.80 कोटी रुपयांचा खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी 2019 मध्ये निविदा काढण्यात आली होती. पण प्रत्यक्षात, दीड वर्षांत केवळ 150 मीटरचा रस्ता बांधला गेला आहे. हा प्रकल्प कोणत्या ग्रहावर सुरू आहे, असा प्रश्न नागपूरकरांना पडला आहे. कारण, अवघ्या 3 किमी रस्त्यासाठी शहरवासीयांना अनंत काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. या संथगतीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

देवभाऊंच्या One State, One Registration प्रणालीमुळे नागरिकांना दिलासा
कामाची गती
मेयो हॉस्पिटल ते लकडगंज येथील सुनील हॉटेलपर्यंत 3 किमी लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. हा रस्ता अरुंद असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अडचणी येत होत्या. या प्रकल्पामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळणार होता, पण तो प्रत्यक्षात कधी मिळणार, याचा काहीच अंदाज नाही.
सुरू झालेल्या या कामाचे कंत्राट जे.पी. बांधकाम कंपनीला देण्यात आले होते. मात्र, जागा उपलब्ध नसल्याच्या कारणास्तव केवळ 150 मीटरचे काम झाले आणि प्रकल्प पूर्णत्वाच्या कालावधीचाही शेवट झाला. एवढ्या मोठ्या प्रकल्पाच्या संथ गतीमुळे सरकारी यंत्रणेची कार्यक्षमता आणि नियोजन कौशल्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
इलेक्शन नंतर आता Narendra Modi करतील निवडणूक आयुक्तांचे सिलेक्शन
सरकार अपयशी
प्रकल्पातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे भूसंपादनाचे रखडलेले काम. तब्बल 580 मालमत्ताधारकांकडून जमिनीचा आवश्यक भाग घेण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. यापूर्वी एकूण 339 कोटी रुपये नुकसानभरपाईसाठी निश्चित करण्यात आले होते. मात्र, नंतर पुन्हा नवीन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आणि त्याचे निष्कर्ष अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे संपूर्ण प्रकल्प अनिश्चिततेच्या गर्तेत सापडला आहे.
या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी किती वेळ लागेल, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी काहीच सांगू शकत नाहीत. हे धक्कादायक असून, नागपूरकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचा प्रयत्न असल्याचे अनेकांचे मत आहे. प्रकल्पाचा 70 टक्के खर्च राज्य सरकार आणि 30% महापालिका उचलणार आहे. मात्र, निधी असूनही काम का सुरू होत नाही, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
निघाला मुहूर्त; Harshwardhan Sapkal स्वीकारतील प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे
रस्त्यात नलिका असतील की नाही
या रस्त्याच्या रुंदीकरणात पाणीपुरवठा आणि जलनिःसारणासाठी नलिका बसवण्यात येणार आहेत की नाही, हे अजून ठरलेले नाही. नियोजनाचा हा प्रकार पाहता, भविष्यकाळात नव्याने खोदकाम करावे लागेल, असा अंदाज आहे. आधीच नागपूरमध्ये खराब रस्त्यांमुळे वाहतुकीची अवस्था बिकट आहे.
या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे हंसापुरी, गांजाखेत, इतवारी आणि सतरंजीपुरा भागांना अरुंद रस्त्यांच्या समस्येतून मुक्ती मिळणार होती. मात्र, या प्रकल्पाच्या संथ गतीमुळे हे भाग अद्यापही वाहतूक कोंडीच्या समस्येने ग्रस्त आहेत.
भल्या भल्या मातब्बरांना डावलून Harshwardhan Sapkal यांची निवड
विकास आहे की थट्टा
नागपूरसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरात विकासकामे एवढ्या संथगतीने होणे हे निश्चितच प्रशासनाच्या नियोजनातील अपयश दर्शवते. हा रस्ता कधी पूर्ण होईल, याचा नेमका अंदाज कोणालाच नाही. त्यामुळे नागपूरकरांनी आता याला ‘दीडशे मीटरचा विकास’ असे नाव द्यावे का, असा सवाल उपस्थित होतो.
सरकार आणि प्रशासनाने तत्काळ याकडे लक्ष देऊन नागरिकांना या त्रासातून मुक्त करावे, अशी शहरवासीयांची मागणी आहे. अन्यथा, नागपूरचा विकास हा केवळ सरकारी कागदांपुरताच मर्यादित राहील.