सावनेरचे आमदार आशिष देशमुख यांनी दिल्लीत रक्षा मंत्र्यांना पत्र लिहून सावनेरमध्ये रक्षा औद्योगिक कॉरिडॉर (DNA) सुरू करण्याची मागणी केली.
विदर्भाच्या मातीतून प्रगतीची नवी उमेद फुलत आहे. एकेकाळी मागासलेपणाच्या सावटाखाली असलेला हा भाग आता विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे सरकतोय. आयटी हब, स्टील हब अशा नावांनी ओळखला जाणारा विदर्भ आता संरक्षण क्षेत्रातही आपली छाप पाडण्यास सज्ज आहे. या प्रवासात नागपूर जिल्ह्यातील सावनेर मतदारसंघाचे भाजप आमदार आशिष देशमुख यांनीही एक पाऊल पुढे टाकत दिल्ली गाठली आहे. त्यांनी थेट संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून सावनेरच्या विकासासाठी भरीव मागणी केली आहे. त्यांचा हा प्रयत्न सावनेरला नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प दर्शवतो. आशिष देशमुख यांनी आपल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील देशाच्या प्रगतीचे कौतुक केले.
पंतप्रधानांच्या नेतृत्वात भारत प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही देशाच्या संरक्षण क्षेत्राला नवे बळ दिले आहे, असे ते म्हणाले. त्यांनी सावनेरच्या विकासासाठी ‘रक्षा औद्योगिक कॉरिडॉर’ (डीएनए) स्थापन करण्याची मागणी केली आहे. जी विदर्भाच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीला नवी दिशा देईल. देशाने गेल्या दशकात संरक्षण उत्पादनात लक्षणीय प्रगती केली आहे. 2014 मध्ये 600 कोटी रुपये असलेले स्वदेशी संरक्षण उत्पादन 2024 मध्ये 24 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. 2029 पर्यंत हे 50 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचे उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर, आशिष देशमुख यांनी सावनेरला रक्षा कॉरिडॉरचे केंद्र बनवण्याची मागणी केली आहे.
रोजगार आणि विकास संधी
महाराष्ट्र सरकारने यासाठी अमरावती, वर्धा, नागपूर आणि सावनेरचा समावेश असलेला प्रस्ताव पाठवला आहे. एमआयडीसीने सावनेरमध्ये यासाठी तब्बल सहा हजार एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे, जी या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पायाभूत आहे. नागपूर, देशाच्या मध्यभागी असलेले हे शहर, औद्योगिक क्षमता, संशोधन, लॉजिस्टिक्स आणि मजबूत कनेक्टिव्हिटीमुळे संरक्षण क्षेत्रासाठी आदर्श आहे. मिहान सेझमुळे नागपूर एरोस्पेस आणि एमआरओ केंद्र म्हणून उदयास येत आहे. वर्धा येथील पुलगाव गोळाबारूद वितरणात महत्त्वाची भूमिका बजावते, तर अमरावती मिसाइल उत्पादनाला चालना देते. याशिवाय, विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन, डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस, ब्रह्मोस एरोस्पेस आणि सोलर इंडस्ट्रीजसारख्या संस्था नागपूरला संरक्षण क्षेत्रातील संपत्ती बनवतात.
आशिष देशमुख यांनी या सगळ्यांचा उल्लेख करत सावनेरला या कॉरिडॉरचा केंद्रबिंदू बनवण्याची जोरदार मागणी केली आहे. आमदार आशिष देशमुख यांचा सावनेरच्या विकासाप्रतीचा ध्यास त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसतो. सावनेरच्या भौगोलिक स्थानाचा फायदा घेत ते येथे नव्या औद्योगिक क्रांतीचे स्वप्न पाहत आहेत. सावनेर दिल्ली-नागपूर महामार्गावर आहे, येथे पाणी आणि वीजेची कमतरता नाही. नैसर्गिक वायू पाइपलाइन आणि कोळशासारखी संसाधने येथे सहज उपलब्ध आहेत. गेलच्या 10 हजार कोटी रुपयांच्या खत प्रकल्पामुळे सावनेर औद्योगिक नकाशावर आणखी मजबूत होत आहे. स्थानिकांना रोजगार देण्याच्या संधींसह सावनेर रक्षा कॉरिडॉरसाठी पूर्णपणे सज्ज आहे, असे देशमुख यांचे म्हणणे आहे. मागील 75 वर्षांत आपण संरक्षण क्षेत्रात परदेशी कंपन्यांवर अवलंबून होतो.
Amol Mitkari : मनोज जरांगेंच्या उपोषणाला मित्रपक्षातूनच पाठिंब्याचा सूर
आता आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करताना सावनेर सारख्या ठिकाणी रक्षा कॉरिडॉर उभारणे ही काळाची गरज आहे, असे देशमुख यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे सावनेर आणि विदर्भाला केवळ आर्थिकच नव्हे, तर सामाजिक आणि औद्योगिक प्रगतीची नवी दिशा मिळण्याची आशा आहे. त्यांचा हा दिल्ली दौरा आणि संरक्षणमंत्र्यांना लिहिलेले पत्र सावनेरच्या भवितव्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, यात शंका नाही.
