महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी माजी अर्थमंत्री केरळमध्ये एका विशेष योजनेचा अभ्यास करीत आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे राज्यात काहीतरी महत्त्वाचे घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केरळच्या यशस्वी लॉटरी मॉडेलचा सखोल अभ्यास करण्यासाठी राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नुकताच तिरुअनंतपुरमला दौरा केला. या दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात लॉटरीच्या माध्यमातून महसूलवाढ, रोजगार निर्मिती आणि सामाजिक कल्याणाचा त्रिसूत्री लाभ मिळवण्याचा नवा विचार चर्चेत आला आहे. केरळच्या सचिवालयात येथे झालेल्या विशेष बैठकीत केरळचे अतिरिक्त मुख्य सचिव के. आर. ज्योतिलाल, लॉटरी विभागाच्या उपसंचालक स्टेफिना रॉड्रिग्ज तसेच आमदार रोहित पाटील आणि इतर मान्यवर सहभागी होते.
बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी केरळच्या लॉटरी योजनेच्या विविध पैलूंचा बारकाईने अभ्यास केला. विशेषतः योजना पारदर्शक ठेवणे, नागरिकांचा विश्वास जपणे आणि त्यांच्या सक्रीय सहभागातून आर्थिक यंत्रणेला मजबुती देणे, या मुद्द्यांवर भर देण्यात आला. मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे नमूद केलं की, केरळमधील लॉटरी ही केवळ नशिबाची गोष्ट नसून ती एक अभ्यासू नियोजनाची, सामाजिक बांधिलकीची आणि आर्थिक व्यवस्थापनाची यशोगाथा आहे. केरळच्या लॉटरीमधून मिळणाऱ्या महसूलाचा मोठा भाग सामाजिक उपक्रमांमध्ये गुंतवला जातो, ज्यामुळे समाजात विश्वास निर्माण होतो.
Corporation Election : जातवैधता प्रमाणपत्राशिवाय नामनिर्देशन नाही
नावीन्यपूर्ण महसूल स्रोत
योजनेतून दरवर्षी हजारो लोकांना रोजगार मिळतो, आणि राज्य सरकारला कोट्यवधींचा महसूल मिळतो. विशेषतः कॅन्सर रुग्णांसाठी आरोग्य निधी, अपंगांसाठी योजना, तसेच शिक्षणासाठीही लॉटरी उत्पन्न वापरले जाते. ही बाब महाराष्ट्रासाठी महत्त्वाची ठरू शकते.या दौऱ्यात फक्त लॉटरीच नव्हे, तर केरळचा एकूण आर्थिक विकास, मसाल्यांच्या निर्यातीचं महत्त्व, आणि ऐतिहासिक वारशाच्या माध्यमातून होत असलेला आर्थिक विकास यावरही चर्चा झाली. मुनगंटीवार यांनी सांगितले की, राज्यांच्या स्थानिक वैशिष्ट्यांचा उपयोग करून आर्थिक आरोग्य सुधारता येऊ शकतं.
केरळ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रात लॉटरी योजना सुरू करण्याची सूचना केली होती. त्यांच्या सूचनेची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठित केली आहे. ही समिती सध्या केरळ दौऱ्यावर आहे. तेथील व्यवस्थेचा बारकाईने अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे. मुनगंटीवार यांचा असा विश्वास आहे की, केरळप्रमाणेच महाराष्ट्रातही लॉटरी योजना पारदर्शकपणे आणि सामाजिक विश्वासाच्या आधारावर राबवली, तर ती केवळ महसूलवाढीपुरती मर्यादित न राहता, रोजगारनिर्मिती व समाजसेवेचा प्रभावी स्त्रोत ठरू शकेल.
वित्तीय शिस्तीचा विचार
राज्याच्या वित्तीय शिस्तीच्या पार्श्वभूमीवर, हा एक वेगळा आणि नावीन्यपूर्ण मार्ग असू शकतो. पारंपरिक मार्गांऐवजी अल्टरनेटिव्ह महसूल स्रोत शोधण्याची गरज सध्या महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याला अधिक आहे. या समितीचा अहवाल आणि त्यातून पुढे होणारी कृती महाराष्ट्राच्या अर्थकारणात एक नवी दिशा दाखवू शकेल, हे निश्चित. आता या योजनेचा महाराष्ट्रात भाग्याचा खेळ ठरेल की परिवर्तनाची चावी, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
