छिंदवाडा विषारी खोकला सिरप प्रकरणाने राज्याला हादरवून सोडले आहे. अनेक मुलांचा मृत्यू झाल्याने मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री आता स्वतः पुढे सरसावले आहेत.
मध्य प्रदेशातील छिंदवाडा आणि बैतूल जिल्ह्यांना विषारी कफ सिरपच्या विळख्याने ग्रासले आहे. या भयंकर संकटाने अनेक निष्पाप बालकांचा बळी घेतला आहे. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने राजकीय वातावरणही तापले असून, विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि उपचार घेत असलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथील रुग्णालयांना भेट दिली.
शुक्ला यांच्या या भेटीने आशेचा किरण निर्माण झाला असला, तरी प्रश्न उपस्थित होतात, हे संकट कधी थांबणार? आणि जबाबदार कोण? नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालय, एम्स आणि खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी शुक्ला बुधवारी (8 ऑक्टोबर) शहरात दाखल झाले. त्यांनी रुग्णालयांमधील बालरोग वॉर्डांना भेटी देत मुलांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि पालकांशी संवाद साधला. त्यांच्या डोळ्यांत आशा आणि चिंता एकाचवेळी दिसत होती. कफ सिरपमधील डायथिलीन ग्लायकोल या घातक रसायनामुळे आतापर्यंत 15 मुलांचा नागपुरात मृत्यू झाला आहे. तर मध्य प्रदेशातही याच कारणाने 15 बालकांचा जीव गेला आहे. ही आकडेवारी हृदय पिळवटून टाकणारी आहे.
Pankaj Bhoyar : शिक्षण क्षेत्रातील रिक्तता संपविण्याचा संकल्प
आरोग्य विभाग सज्ज
उपमुख्यमंत्र्यांनी आपली भेट मेडिकल कॉलेजपासून सुरू केली. तिथे त्यांनी डीन डॉ. राज गजभिये आणि बालरोग विभागप्रमुख डॉ. मनीष तिवारी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मुलांच्या उपचारासाठी सर्वतोपरी आर्थिक आणि वैद्यकीय मदत देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर, एम्स आणि इतर खाजगी रुग्णालयांमधील पालकांशी बोलताना त्यांनी जबाबदार औषध कंपनी आणि संबंधितांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे ते ठामपणे म्हणाले. शुक्ला यांनी सांगितले की, छिंदवाड्यातील 600 पैकी 443 कफ सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
सरकारने डॉक्टरांना रुग्णांना उत्तम उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, चार वर्षांखालील मुलांना लेबल असलेले सिरप देण्यास मनाई आहे. तरीही, या नियमांचे उल्लंघन झाल्याने हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. एका विशिष्ट डॉक्टरचे नाव वारंवार समोर येत असल्याने, त्यांचीही चौकशी होणार आहे. सर्व दोषींवर कठोर कारवाई होईल, असे शुक्ला यांनी स्पष्ट केले. या संकटाने समाजाच्या आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेची कसोटी पाहिली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीने कुटुंबीयांना आधार मिळाला असला, तरी त्यांच्या मनातील भीती आणि शंका कायम आहेत.
औषध कंपन्यांच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप जीव का बळी जावेत? असा सवाल पालक विचारत आहेत. सरकारने कारवाईचे आश्वासन दिले असले, तरी यापुढे अशा घटना रोखण्यासाठी काय पावले उचलली जाणार? कफ सिरपच्या गुणवत्तेची खातरजमा कशी होईल?
