नुकत्याच सुरू झालेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. कोणत्या क्षणी काय होईल याचा अंदाज लावणं जणू अशक्य झालं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मोठी राजकीय चर्चा सध्या राज्यात तापली आहे. ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य एकत्रिकरणाची. एकीकडे काही पक्ष आनंद व्यक्त करत आहेत. मात्र या घडामोडीवर शिंदे गटात संताप असल्याचेच दिसून येत आहे. ठाकरे बंधूंच्या मिलनावर प्रश्न केल्यास एकनाथ शिंदे संतापले होते. आता त्यांच्या गटातील उदय सामंत यांनीही रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
उदय सामंत यांनी यावर आपली टीका करण्याची संधी सोडली नाही. त्यांनी आपल्या विशिष्ट शैलीत खोचक टिप्पणी करत विचारलं, हा क्रीडा महोत्सव चालू आहे का? या विधानाने त्यांनी स्पष्टपणे या युतीच्या शक्यतेवर उपरोधिकपणे प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. उदय सामंत पुढे म्हणाले की, आम्हाला कोणाबद्दलही पोटदुखी नाही. शिंदे साहेबांनी स्थानिकांना नव्याने सामावून घेतलं आहे. राज ठाकरे हे एक स्वतंत्र विचारांचं नेतृत्व आहे. मात्र, आता त्यांच्यावर अटी घालण्यात येत आहेत. बीजेपीबरोबर बोलायचं नाही. फडणवीस यांच्याशी संबंध ठेवायचे नाहीत. असे निर्बंध लावले आहेत.
Nana Patole : महायुती सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे
राज ठाकरेंवर निर्बंध
शिंदे यांची सावलीसुद्धा पडता कामा नये. दिल्लीशी संपर्क ठेवायचा नाही. हा सगळा प्रकार म्हणजे काय क्रीडा महोत्सव आहे का? सामंत यांनी हेही स्पष्ट केलं की, जर दोघे भाऊ (उद्धव आणि राज ठाकरे) युती करत असतील, तर त्यात आमचा काही विरोध नाही. पण त्यांचा स्वभाव पाहता असं होईल असं वाटत नाही. एकनाथ शिंदे यांनाही विचारलेल्या प्रश्नावर मात्र प्रतिक्रिया देणं टाळलं. पत्रकार परिषदेत जेव्हा त्यांना या संभाव्य युतीबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा ते थेट भडकले. तू कामाचं बोल. राजकारण आहे की रोजचंच, असं म्हणत त्यांनी विषय टाळण्याचं स्पष्ट संकेत दिले.
मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. अशा वेळी ठाकरे बंधूंचं एकत्र येणं, हा राजकीय पटलावर मोठा ट्विस्ट ठरू शकतो. सत्ताधारी गट असो की विरोधक प्रत्येक पक्ष या घडामोडीकडे बारकाईनं पाहतो आहे. आता उद्धव-राज यांच्या युतीची शक्यता प्रत्यक्षात येते का, की ती फक्त चर्चेपुरती मर्यादित राहते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
