
गडचिरोलीत नागरिकांसाठी पाणीटंचाईचा प्रश्न एक मोठे आवाहन बनले आहे. विजय वडेट्टीवार यांनी वैनगंगा नदीच्या पात्रात उतरून आंदोलन केले.
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी हा मोठा प्रश्न बनला आहे. गोसेखुर्द धरणातील पाणी अडवून ठेवल्याने वैनगंगा नदी कोरडी पडत आहे. याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसतो आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले. वैनगंगा नदीच्या पात्रात उतरून काँग्रेसने पाणी सोडण्याची मागणी केली. विशेष म्हणजे या आंदोलनाला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचीही हजेरी होती.
आंदोलनादरम्यान वडेट्टीवार यांनी प्रशासनाला ठणकावले की, जर सोमवारी पाणी सोडले नाही, तर मंगळवारी आम्ही अधिकाऱ्यांना आमच्या पद्धतीने धडा शिकवू. त्यांचा रोख थेट सरकार आणि प्रशासनावर होता. जनतेला पिण्यासाठी पाणी मिळत नाही, शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे, आणि प्रशासन मात्र केवळ वसुलीच्या मागे आहे, असा आरोपही त्यांनी केला. गडचिरोली अतिदुर्गम व मागास जिल्हा आहे.

भूजल पातळी घटली
बहुतांश जनता येथील शेतीवर अवलंबून आहे. गोसेखुर्द धरणातील पाणी रोखून धरण्यात आल्याने वैनगंगा नदी कोरडी पडली आहे. परिणामी, शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्ध नाही, भूजल पातळी घटली आहे, आणि गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. वडेट्टीवारांनी प्रशासनाच्या भूमिकेवर कडाडून टीका केली.
आमदार-खासदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून विनंती करण्यात आली, पण प्रशासन हलले नाही. उलट, त्यांनी पाणी सोडण्यासाठी पाणीपट्टी भरण्याची अट घातली. पाणीटंचाईच्या वेळी अशा अटी लागू नसतात, तरीही सरकार आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत. असे ते म्हणाले. या आंदोलनात केवळ पाणी सोडण्याची मागणीच नव्हे, तर शेतकरी व मजूर वर्गाच्या हिताच्या इतर मुद्द्यांवरही आवाज उठवण्यात आला.
शेतकऱ्यांचा मागण्या
विमानतळासाठी सुपीक जमिनीचे अधिग्रहण थांबवावे. गडचिरोलीत प्रस्तावित विमानतळासाठी सुपीक शेती जमिनीऐवजी अन्य शासकीय किंवा वनजमिनीचा वापर करावा. शेतकऱ्यांशी चर्चा न करता एमआयडीसी विस्तार नको, भेंडाळा येथील एमआयडीसी साठी सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय जमिनीचे अधिग्रहण करू नये.कोटगल बॅरेज प्रकल्पग्रस्तांना मोबदला द्यावा. बॅरेजसाठी शेतकऱ्यांची जमीन घेतली गेली, मात्र त्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. अश्या मागण्या केल्या गेल्या.
त्वरित भरपाई देण्यात यावी आणि बुडीत क्षेत्रातील शेतीसाठी अतिरिक्त नुकसानभरपाई मिळावी. मनरेगा मजुरांचे थकीत वेतन द्यावे. अनेक मजुरांना अजूनही त्यांचे वेतन मिळालेले नाही, ते त्वरित द्यावे. ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पातील शेतकऱ्यांना नवीन दरानुसार मोबदला मिळावा. वडसा गडचिरोली ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पामुळे जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य दराने भरपाई मिळावी, अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत.