शेतकऱ्यांच्या आक्रोशाला आवाज देत विजय वडेट्टीवारांनी महायुती सरकारवर थेट हल्ला चढवला. महाराष्ट्र विकण्याचा डाव उघड करत त्यांनी जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्राच्या मातीत शेतकऱ्यांचे श्रम आणि स्वप्ने दडलेली आहेत. सध्याच्या महायुती सरकारने त्यांना उपेक्षेची वागणूक दिली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप केला आहे. कर्जमाफीचा अभाव, सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव नसणे आणि नैसर्गिक आपत्तींसह कीडरोगांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. लाडकी बहिण योजनेसारख्या योजनांचा गाजावाजा निवडणुकीपुरता केला गेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक संपताच या सगळ्या योजना बंद होण्याची शक्यता आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
राज्याच्या आर्थिक परिस्थितीवरही विजय वडेट्टीवार यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रावर सध्या 9 लाख कोटींचे कर्ज आहे. लोकांची देणी धरून हा आकडा 10 लाख कोटींवर पोहोचतो. केंद्र सरकार कर्जवाढीला परवानगी देत असले, तरी राज्याची आर्थिक कुवत पाहता हे कर्ज फेडणे जवळपास अशक्य आहे. सत्तेच्या लालसेत महाराष्ट्राला आर्थिक खाईत लोटण्याचा डाव रचला जात असल्याचे देखील विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांचे संकट
शेतकऱ्यांचे दुखणे दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सोयाबीनवरील रोग आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पंचनामे करून तातडीने मदत देण्याची गरज आहे. असे असताना सरकार निष्क्रिय आहे. शेतकऱ्यांना आधाराची आवश्यकता असताना त्यांच्यावर उपेक्षेची वेळ आली आहे. महायुती सरकारने मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाच्या योजनांचा निधी कमी करून त्यांच्यावर अन्याय केला आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली होत आहे. या समाजांना विकासाच्या प्रवाहापासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.
पायाभूत सुविधांच्या नावाखाली कमिशनखोरी बोकाळली आहे. कामांचे अंदाजपत्रक दुप्पट करून मर्जीतील लोकांना लाभ मिळवून दिला जात आहे. 200 कोटींच्या कामाचे 400 कोटी करून मधली रक्कम सत्ताधारी खिशात घालत असल्याचा आरोप आहे. सरकारी भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापनामुळे महाराष्ट्र आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अधोगतीकडे जात आहे. वडेट्टीवार यांनी जनतेला सजग राहून निवडणुकीत या अन्यायाचा हिसेब मागण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्राला वाचवण्यासाठी एकजुटीने लढण्याची वेळ आली आहे.
