डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे कापड, स्मार्टफोन, रत्न-आभूषण आणि फार्मास्युटिकल्स उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला आर्थिक कोंडीत पकडण्याचा खेळ खेळला आहे. रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याचा राग मनात बाळगत ट्रम्प प्रशासनाने भारतातून येणाऱ्या आयातींवर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय 27 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 12:01 वाजता (पूर्व प्रमाणवेळेनुसार) लागू झाला आहे. यापूर्वी 7 ऑगस्टपासून लागू झालेल्या 25 टक्के टॅरिफमुळे भारताच्या आयातींवरील एकूण शुल्क आता तब्बल 50 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. या निर्णयाने भारताच्या अर्थव्यवस्थेला काळ्या ढगांनी घेरले आहे. विशेषतः महाराष्ट्रातील शेतकरी व कामगार यांच्या जीवनावर गंभीर आर्थिक संकट कोसळले आहे. कापड, ऑटो पार्ट्स, टायर, रसायने, कृषी रसायने आणि हिरे यांसारख्या क्षेत्रांना या टॅरिफचा थेट फटका बसणार आहे.
यवतमाळ, ज्याला ‘कॉटन किंग’ म्हणून ओळखले जाते, तिथल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे स्वप्न आता धुळीला मिळत आहे. निर्यातीतील घट आणि त्यामुळे निर्माण होणारी बेरोजगारी यामुळे लाखो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. मोदींच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे भारताला ही वेळ आली आहे. ट्रम्प यांच्या सोबतच्या मैत्रीचे ढोल पिटणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय हितांचे रक्षण करण्यात सपशेल अपयशी ठरले, असे यशोमती ठाकूर यांनी ठणकावून सांगितले. भारताचा कापड उद्योग, जो देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. व्यापाऱ्यांच्या ऑर्डर्स बंद होत आहेत. कामगारांना घरी बसण्याची वेळ आली आहे.
Nagpur : खोट्या नंबर प्लेट्स, हातात धारदार शस्त्र, नेमकं चाललंय तरी काय
शेतकऱ्यांची आर्थिक अडचण
यशोमती ठाकूर यांनी यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. कापड उद्योगातील लाखो कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. कारखाने बंद होत आहेत, कामगार बेरोजगार होत आहेत. हे सर्व पंतप्रधानांच्या परराष्ट्र धोरणातील अपयशाचे परिणाम आहेत, असे त्या म्हणाल्या. केवळ कापडच नव्हे, तर स्मार्टफोन, फार्मास्युटिकल्स आणि रत्न-आभूषण यांसारख्या क्षेत्रांनाही या टॅरिफचा जबर फटका बसला आहे. या संकटाचे सर्वात गंभीर परिणाम तरुणांवर होणार आहेत. बेरोजगारीचे काळे ढग आता भारताच्या तरुणाईवर घोंघावत आहेत. यशोमती ठाकूर यांनी यावरून सरकारला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले. मोदींच्या ट्रम्प यांच्याशी असलेल्या तथाकथित मैत्रीमुळे भारताच्या बाजारपेठ आता बांगलादेश, चीन आणि व्हिएतनामकडे वळत आहेत. आपल्या तरुणांचे भविष्य आणि शेतकऱ्यांचे कष्ट या सरकारने पणाला लावले आहेत, असे ठाकूर यांनी ठणकावले.
ट्रम्प यांचा हा निर्णय रशिया-युक्रेन शांतता कराराच्या प्रयत्नांना खीळ घालण्याच्या पार्श्वभूमीवर आला आहे, ज्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. यवतमाळसह विदर्भातील शेतकरी, जे कापसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत, आता आर्थिक संकटात सापडले आहेत. रोजगाराच्या संधी कमी होत असल्याने आणि निर्यातीवर मर्यादा येत असल्याने स्थानिक अर्थव्यवस्थाही कोलमडत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. पण सरकारकडून अद्याप कोणतीही स्पष्ट रणनीती दिसत नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेला आणि विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या आर्थिक त्सुनामीतून वाचवण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे, अन्यथा हे संकट आणखी गहिरे होण्याची भीती आहे.
