
नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. काही भागांमध्ये संचारबंदी शिथिल करण्यात आली असली तरी सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे.
नागपुरात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले होते. या वादामुळे शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक भागांमध्ये तणावग्रस्त वातावरण पाहायला मिळाले, त्यामुळे नागपूरकरांमध्ये चिंता वाढली होती. मात्र आता परिस्थिती हळूहळू पूर्ववत होत असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रशासनाच्या तातडीच्या उपाययोजनांमुळे नागपुरातील परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे दिसून येते.
नागपूर शहरातील काही भागांत संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा आणि इमामवाडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी उठवण्यात आली आहे. मात्र, कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिल ठेवण्यात आली आहे. यानंतर रात्री 10 पासून संचारबंदी लागू राहील. यशोधरानगर पोलीस हद्दीतील संचारबंदी पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार आहे, असे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी स्पष्ट केले आहे.

तणाव कमी होतोय
नागपुरात सोमवारी उसळलेल्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कथित मास्टरमाईंड फहीम खान याच्यासह सहा जणांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला होता. परिणामी, प्रशासनाने शहरातील एकूण 11 पोलिस स्टेशन हद्दीत संचारबंदी आणि जमावबंदी लागू केली होती. मात्र, परिस्थिती काही प्रमाणात निवळत असल्याने नंदनवन आणि इतर भागातील संचारबंदी हटवण्यात आली आहे.
गुरुवारी काही भागांमध्ये दुपारी दोन ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. मात्र, दंगल नियंत्रणात ठेवण्यासाठी उर्वरित नऊ पोलिस स्टेशन हद्दीत कर्फ्यू कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये गणेशपेठ, तहसील, कोतवाली, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, इमामवाडा आणि यशोधरानगर या भागांचा समावेश होता.
दंगलीत व्यक्तीचा मृत्यू
नागपुरातील मध्यवर्ती भागात झालेल्या हिंसाचारात 38 वर्षीय इरफान अन्सारी यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला आहे. यामुळे प्रशासनाने सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
नागपूर पोलीस प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कोणत्याही अनुचित प्रकारात सहभागी होऊ नका, असेही सांगण्यात आले आहे. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी पोलीस आणि प्रशासन प्रयत्नशील आहेत.