
न्याय न मिळाल्याने एका तरुण इंजिनीअर शेतकऱ्याने मुंबईतील विधिमंडळाबाहेर झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत असताना, विधानभवनाच्या बाहेर एक अनोखा आणि धक्कादायक प्रकार घडला. शेवटच्या दिवशी, एका तरुणाने आपल्या मागण्यांसाठी थेट झाडावर चढून आंदोलन केले. हा प्रकार इतका गंभीर होता की काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या विषयाला थेट सभागृहात मांडले.
मुंबईतील विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अंतिम दिवस सुरू होता. मात्र, या शेवटच्या दिवशीच परिसरातील एका झाडावर एका व्यक्तीने आंदोलनाचा अनोखा मार्ग स्वीकारला. त्या व्यक्तीने हातात भारताचा तिरंगा घेतलेला होता आणि त्याच्या सोबत एक मोठा बॅनर देखील झळकत होता. अनेक प्रयत्न करूनही, त्या व्यक्तीने आंदोलन मागे घ्यायला नकार दिला. प्रशासन आणि सुरक्षारक्षकांनी त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो आपल्या मागण्यांवर ठाम राहिला.

टोकाचा निर्णय
सभागृहात नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित करत तरुणाचे नाव ईश्वर शिवाजी शिंदे आहे. तो एक इंजिनीयर असलेला शेतकरी असल्याचे सांगितले. आपल्या न्याय्य मागण्यांकडे सरकार आणि प्रशासन लक्ष देत नाही, या निराशेने त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. ‘जेव्हा मी नष्ट होईल, तेव्हा माझी आठवण जगाला येईल,’ अशा हृदयद्रावक शब्दात त्याने आपल्या पत्रात आपली व्यथा मांडली होती.
ईश्वर शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आणि कृषीमंत्र्यांना पत्र लिहून आपली परिस्थिती समजावून सांगितली होती. मात्र, अनेक वेळा पाठपुरावा करूनही त्यांच्या मागण्यांकडे कोणतेही लक्ष देण्यात आले नाही. या परिस्थितीला कंटाळून त्यांनी आझाद मैदानावर देखील आंदोलन केले, परंतु तेथेदेखील त्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही, असं पटोलेंनी सांगितले.
आत्महत्येचा इशारा
सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे अखेर ईश्वर शिंदे यांनी विधानभवनाच्या बाहेरच झाडावर चढून आत्महत्येचा इशारा दिला. त्यांच्या या कृतीमुळे संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. अखेर, धुळे जिल्ह्याचे आमदार घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या तरुणाच्या मागण्यांकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले.
या आश्वासनानंतर, अखेर ईश्वर शिंदे यांनी आंदोलन मागे घेतले आणि झाडावरून खाली उतरले. मात्र, या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाल्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार किती गांभीर्याने पाहते, याबाबत नवा प्रश्न उपस्थित झाला आहे. ईश्वर शिंदे यांचे आंदोलन सरकारसाठी एक धोक्याची घंटा आहे की, शेतकऱ्यांच्या समस्या अधिक तीव्र होत आहेत आणि त्यांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे असं मत नानांनी व्यक्त केले.