महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : गव्हात काहीतरी बिनसलं अन् लोकांचं डोकं रिकामं झालं

Buldhana : केसगळती प्रकरणात सरकारचे दुर्लक्ष 

Author

बुलढाणा जिल्ह्यातील रहस्यमय केस गळती प्रकरणावर काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर गंभीर आरोप करत रेशनमधील गहूमुळे हा प्रकार घडल्याचा दावा केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर केस गळतीच्या समस्येला सामोरे जात आहेत. या विचित्र प्रकारामुळे अनेकांचे टक्कल पडत आहे, मात्र यामागचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या मुद्द्यावर सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, राज्य सरकार जनतेच्या आरोग्याशी खेळ करत असून, या विषयावर कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही.

सपकाळ यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, डिसेंबर महिन्यात बुलढाणा जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील 19 गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर केस गळून टक्कल पडण्याचे प्रकार घडले. मात्र, सरकारने यामागील वैज्ञानिक कारण अद्याप जाहीर केलेले नाही. उलट, सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. सरकारने ICMR कडे तपासणीसाठी केस सोपवली असली, तरी तीन महिन्यांनंतरही त्या अहवालाचा मागमूस नाही. सपकाळ यांनी सरकारला सवाल केला की, हा अहवाल चंद्रावरून आणायचा आहे का, जो अजूनही उपलब्ध नाही?

Eknath Shinde : मिस्टर बिननी शिवसेना डस्टबिनमध्ये टाकली

बावस्करांचा पुढाकार

घटनेची चौकशी करण्यासाठी प्रसिद्ध संशोधक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. हिम्मतराव साळुबा बावस्कर यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी त्वचा, नखं, माती आणि रेशनवर वितरीत करण्यात आलेल्या गव्हाचे सॅम्पल गोळा करून प्रयोगशाळेत तपासणी केली. त्यांच्या संशोधनानुसार, या गव्हात तब्बल 14.52 टक्के सेलेनियम असल्याचे आढळले आहे. संशोधनानुसार, 1.9 टक्क्यांपर्यंत सेलेनियम हानिकारक नसते, परंतु अधिक प्रमाणात असलेल्या सेलेनियममुळे केस गळणे, मळमळ, त्वचेच्या समस्या आणि मधुमेहासारख्या तक्रारी उद्भवतात.

बावस्कर यांनी हा अहवाल सरकारकडे सादर केला, पण त्याला कोणतेही महत्त्व देण्यात आले नाही. उलट, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना थेट अवमानजनक शब्दांत टिंगलटवाळी केल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. सपकाळ यांनी यावर सरकारला सवाल केला की, ज्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्यांना काहीही कळत नाही का, असे प्रशासन सुचवू पाहत आहे?

सपकाळांचा आरोप 

विधान परिषदेच्या सभागृहात या प्रश्नाला वाचा फोडली असता, सरकारने दिशाभूल करणारे उत्तर दिल्याचा आरोप सपकाळांनी केला. हा केवळ राजकीय विषय नाही, तर जनतेच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे. सरकार एखाद्या मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी अहवाल दडपण्याचा प्रयत्न करत आहे का? हा गहू कुठून आला आणि सरकार त्यावर काय भूमिका घेणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सरकारने जाहीरपणे द्यावीत, अशी मागणी सपकाळ यांनी केली.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!