
गडचिरोली पोलिसांनी अवैध दारूविक्रीवर मोठी कारवाई करत 61 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.
गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीला मोठे यश मिळाले होते. तालुक्यातील 106 गावांपैकी तब्बल 64 गावे अवैध दारूमुक्त झाली आहेत. हे यश सहज मिळालेले नाही, तर यामागे पोलिस प्रशासन, मुक्तिपथ तालुका चमू, तसेच गाव संघटनांचे अथक प्रयत्न आहेत. मात्र जिल्ह्यात दारूबंदी लागू असतानाही काही ठिकाणी अवैध दारूची वाहतूक व विक्री सुरूच आहे. मात्र, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यातील पोस्ट देसाईगंज येथे 2018 ते 2024 या कालावधीत दाखल झालेल्या 520 दारूबंदी प्रकरणांतील मुद्देमाल 28 मार्च 2025 रोजी अधिकृतपणे नष्ट करण्यात आला. न्यायालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परवानगीने पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत विदेशी आणि देशी दारूच्या हजारो बाटल्या, तसेच बिअरच्या टिनांचे संपूर्ण नष्टिकरण करण्यात आले.

Narendra Modi : गुढीपाडव्याच्या साक्षीने पंतप्रधान संघभूमीवर
पर्यावरण सुरक्षित
पोलीस निरीक्षक अजय जगताप, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी चंदन भगत, आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. त्यांनी हजारो लिटर अवैध दारू नष्ट केली. या कारवाईत विविध प्रकारच्या दारूच्या बॉटल्सचा समावेश होता. यामध्ये विदेशी दारूच्या तसेच देशी दारूच्या नष्ट करण्यात आल्या. त्याचप्रमाणे, बिअर बॉटलांचाही समावेश होता.
संपूर्ण मुद्देमालाची विल्हेवाट लावताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने 15 बाय 15 फूट खोल खड्डा खोदण्यात आला. त्यानंतर, जप्त केलेल्या दारूच्या बॉटल्स रोड रोलरच्या साहाय्याने चुरडून मातीसारख्या बारीक केल्या गेल्या. अखेरीस, संपूर्ण काचा आणि प्लास्टिकच्या बॉटल्स खड्ड्यात टाकून योग्य रीतीने मुरुमाने झाकण्यात आल्या, जेणेकरून पर्यावरणावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही.
महिलांची मोठी भूमिका
गडचिरोलीतील अनेक गावे 1993 पासूनच दारूबंदीच्या समर्थनार्थ उभी आहेत. यामध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. गावातील शांतता भंग होऊ नये, व्यसनांमुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये, आर्थिक परिस्थिती खालावू नये यासाठी महिलांनी स्वतः पुढाकार घेतला होता. 40 गावांत ‘मुक्तिपथ-शक्तिपथ’ महिला संघटना स्थापन करून या महिलांनी अवैध दारू विक्रीविरोधात लढा सुरू ठेवला आहे. गाव संघटनांच्या मदतीने दारूमुक्तीसाठी विविध उपाय राबवले जातात.
गडचिरोलीत सध्या 64 गावे दारूमुक्त झाली असली, तरी उर्वरित गावांमध्ये अजूनही काम बाकी आहे. पोलिस विभाग, स्थानिक संघटना आणि महिला शक्तीच्या एकत्रित प्रयत्नांतून संपूर्ण तालुका दारूमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. दारूबंदीमुळे सामाजिक आणि आर्थिक सुधारणा होणार आहे. संपूर्ण जिल्हा व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू आहेत. ही मोहिम केवळ कायद्याने नव्हे, तर लोकसहभागाने यशस्वी केली जात आहे. भविष्यात गडचिरोली संपूर्णपणे दारूमुक्त होईल, अशी अपेक्षा आहे.