
अकोल्यातील रामनवमी मिरवणुकीत विविध राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मिरवणुकीचा राजकीय प्रभाव महत्त्वाचा ठरणार आहे.
महाराष्ट्रात सध्या रामनवमीच्या उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. सहा एप्रिलपासून रामनवमीच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. संपूर्ण राज्यभर हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेषतः विदर्भ आणि अकोला जिल्ह्यातील रामनवमीच्या मिरवणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या राज्यातील राजकीय वातावरणामुळे हा उत्सव आणखी प्रतिष्ठेचा होण्याची शक्यता आहे. नागपुरातील अलीकडच्या दंगलीमुळे जातीय वाद उफाळला. त्याचा प्रभाव संपूर्ण राज्यभर पडल्याचे दिसते.
नागपूर दंगलीतील आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनातील चर्चांमुळे महाराष्ट्राचे राजकारण आधीच तापलेले आहे. त्यात आता रामनवमीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील विशेष करून अकोल्यातील परिस्थितीही अधिक लक्षवेधी बनली आहे. अकोला पश्चिम मतदारसंघाची निवडणूक काँग्रेसने जिंकली आहे. आमदार साजिद खान पठाण हे या मतदारसंघाचे आमदार झाले आहेत. त्यांचे नाव अकोल्यातील दंगलीत समोर आल्याचा आरोप आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अकोल्यातील रामनवमीची शोभायात्रा नेहमीपेक्षा अधिक चर्चेत येण्याची शक्यता आहे.

मतांसाठी सांस्कृतिक सोहळा
अकोल्यातील रामनवमीची मिरवणूक विदर्भातील सर्वात मोठी आणि भव्य शोभायात्रांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या वर्षीच्या मिरवणुकीत अनेक धार्मिक झाकी आणि अनेक मंडळ सहभागी होणार आहेत. या शोभायात्रेच्या माध्यमातून विविध पक्ष आपले शक्तिप्रदर्शन नक्कीच करणार आहेत. भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हे सर्व या उत्सवात आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी अकोल्यातील रामनवमी मिरवणुकीचे नेतृत्व भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा करत होते. आता त्यांची जागा भाजपमध्ये कोण घेणार असा प्रश्न आहे. आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेता यंदा रामनवमीचा ही मिरवणूक अधिक राजकीय रंग घेण्याची शक्यता आहे. सगळेच राजकीय पक्ष या उत्सवाचा प्रभाव आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत.
आघाडी विरुद्ध युती
महाराष्ट्राच्या राजकीय रणसंग्रामात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष सतत रंगत असतो. कोणत्याही मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी दोघे सोडत नाहीत. अकोला दंगलीत साजिद खान पठाण यांचे नाव आले. त्यानंतर त्यांना काँग्रेसने नागपूर दंगलीतील सत्यशोधन समितीत घेतले. त्यावरून भाजपने हल्लाबोल केला. अशात आता रामनवमी उत्सव आला आहे.
उत्सवासाठी भाजपकडून अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, भाजप नेते विजय अग्रवाल, किशोर मांगटे पाटील हे अग्रस्थानी असतील. माजी नगराध्यक्ष हरीश अलिमचंदानी हे देखील दरवर्षी प्रमाणे मिरवणुकीत दिसतील. शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, ठाकरे गटाकडून आमदार नितीन देशमुख, शहर प्रमुख राजेश मिश्रा हे शक्ती प्रदर्शन करतील. मनसेकडून पंकज साबळे आणि त्यांचे सहकारीही सक्रियपणे सहभागी असतील असे दिसत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून कोण उत्सवात दिसेल हे चित्र अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे यंदाच्या रामनवमी उत्सवात राजकीय गुलाल नक्की उधळला जाणार आहे.