
अजित पवार यांनी शेतकर्यांच्या कर्जमाफीवर केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांवर टांगती तलवार लटकत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकर्यांचा मुद्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. राज्य सरकारने आगामी तीन वर्षे कर्जमाफी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याच्या आर्थिक स्थितीची जाणीव करून देत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचे सांगितले होते. त्याचाच पुनरुच्चार करत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही भूमिका स्पष्ट केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे गेले होते. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांकडून पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा पाहिला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘अजितदादांची भूमिका हीच सरकारची भूमिका आहे.’ त्यामुळे शेतकऱ्यांना आगामी तीन वर्षे तरी कर्जमाफी मिळणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.

Vinod Agrawal : शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी वीज भागाला देऊन टाकले अल्टिमेटम
सरकारची भूमिका
राज्यातील शेतकरी वर्गाने मोठ्या विश्वासाने महायुतीला मतदान केले होते. विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भारतीय जनता पक्षाने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षाची जबाबदारी मोठी आहे. मात्र, राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता सरकारला हे आश्वासन पूर्ण करणे शक्य नसल्याचे अजित पवार आणि आता फडणवीस यांनी सांगितले आहे. यामुळे अनेक शेतकरी निराश झाले आहेत, कारण त्यांना आशा होती की सरकार त्यांच्या कर्जाचा भार हलका करेल.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यात झालेल्या शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की, ‘सगळी सोंग करता येतात, पण पैशाचे सोंग करता येत नाही.’ त्यांनी सांगितले की, निवडणुकीत कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, परंतु राज्याची आर्थिक स्थिती पाहता ते सध्या शक्य नाही. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
Maharashtra : महावितरणच्या नव्या धोरणामुळे लाखो ग्राहकांना दिलासा
विरोधकांचा हल्लाबोल
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, ‘महायुती सरकार शेतकरी, महिला आणि सामान्य जनतेच्या आशांना तुडवत आहे. निवडणुकीच्या काळात कर्जमाफी आणि आर्थिक मदतीचे गाजर दाखवून जनतेला भुलवले गेले. मात्र, सत्ता मिळाल्यानंतर हेच सरकार जनतेच्या अपेक्षा धुळीला मिळवत आहे.
कर्जमाफीसाठी अजून तीन वर्षे वाट पाहावी लागणार असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. महागाई, नैसर्गिक आपत्ती आणि शेतीतील वाढत्या अडचणींमुळे शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा होती. मात्र, राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या भविष्यावर मोठा प्रभाव टाकणार आहे.