
RSS & Deekshabhoomi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा दीक्षाभूमीवर नतमस्तक झालेत. यापूर्वी 2017 मध्ये पंतप्रधानांनी दीक्षाभूमीला भेट दिली होती. यापूर्वीही पंतप्रधान मोदी नागपुरात येऊन गेलेत. मात्र त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली नव्हती. लोकसभा निवडणूक जवळ असल्यानं त्यांनी ही भेट टाळल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र यंदा त्यांनी संघभूमी ते दीक्षाभूमी असा प्रवास केला आहे.
उपराजधानी नागपूरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा भेट दिली. मात्र त्यांची यंदाची भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच नागपुरात आलेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी महोत्सव आता साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदींचा दौरा महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नव्यानं उत्साह संचारला आहे.
PM At Nagpur : पंतप्रधानांचे डॉ. हेडगेवारांना अभिवादन
साडेचार तासांचा दौरा
नागपुरातील पंतप्रधानांचा दौरा सुमारे साडेचार तासांचा आहे. या दौऱ्यात सगळ्यात सुरुवातीला मोदींनी संघ मुख्यालयात जात स्मृती मंदिरापुढं आपलं डोकं टेकवलं. त्यानंतर ते थेट दीक्षाभूमी येथे गेले. दोन शक्तीस्थळांना भेट दिल्यानंतर मोदींनी नागपुरातील आपल्या पुढच्या कार्यक्रमांकडं मोर्चा वळविला. दीक्षाभूमीवर नतमस्तक झाल्यानंतर मोदींनी तेथील पुस्तकामध्ये आपला अभिप्राय नोंदविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून संघ मुख्यालयापर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदींचे जोरदार स्वागत केलं. संघ मुख्यालयातून दीक्षाभूमीकडं पंतप्रधानांचा ताफा निघाला. त्यावेळी ताफा मंदगतीनं पुढं सरकत होता. मोदींनी आपल्या वाहनातून रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या चाहत्यांना अभिवादनही केलं. अनेक ठिकाणी भाजपचं कार्यकर्ते हातात कमळाचं चिन्ह आणि मोदींचा फोटो घेऊन थांबले होते. दीक्षाभूमीच्या आसपासच्या गर्दीतील लोकांच्या हातामध्ये संविधानाची प्रतही होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अभिप्राय पुस्तकातही मोदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. गोळवलकर गुरूजी आणि डॉ. हेडगेवार यांनाही त्यांनी नमस्कार केला. स्वयंसेवकांसाठी दोन्ही संघ प्रमुखांनी किती मोलाचं कार्य केलं. याचा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. संघभूमी आणि दीक्षाभूमी या दोन्ही ठिकाणी मोदींनी लिहिलेल्या अभिप्रायातून त्यांनी आगळावेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या नागपूर दौऱ्यातून मोदींनी अनेकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. आता मोदींच्या नागपूर दौऱ्यानंतर कोणते राजकीय बदल होतात, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.