
Change After Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच उपराजधानी नागपूर येथे आले. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी संघाचे मुख्यालय असलेल्या महाल परिसरात मोठी दंगल झाली. अनेक दिवसांपर्यंत या भागामध्ये संचारबंदी लागू होती. दंगलीच्या या घटनेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील भडक विधान करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे फटकारले होते. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा योग्य नाही असे संघाने स्पष्ट केले होते. संघाने लगावलेल्या या फटकारीचा परिणाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यात देखील दिसून आला.
विधानसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है, असा नारा दिला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ची हाक हिंदू मतदारांना दिली होती. त्यामुळे पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यात पुन्हा एकदा यावर खल होईल, असे वाटत होते. मात्र भाजपच्या अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नागपुरात असताना ‘बटेंगे तो कटेंगे’ची व्याख्या बदलल्याचा अनुभव आला.
Narendra Modi : हेडगेवारांच्या जन्मदिवशी साधला सुवर्णयोग
परकीयांपासून धोका
निवडणुकीपूर्वी मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी ‘बटेंगे तो कटेंगे’ची व्याख्या काहीशी वेगळी दिसून येत होती. महाल भागातील दंगल आणि निवडणुकीनंतर मात्र अनेकांचा सूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर येथील दौऱ्या दरम्यान बदललेला दिसला. भारताला पाकिस्तान आणि बांगलादेशातून येणाऱ्या घुसखोरांपासून धोका आहे. त्यामुळे भारतातील हिंदू आणि मुस्लिम यांनी एकत्र येत अशा पोरांना चोख प्रतिउत्तर दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर येथे असताना नोंदवली.
महाल भागातील दंगलीनंतर भाजपचे जे नेते अत्यंत भडकपणे विधानं करीत सुटले होते, त्यांनी देखील हाच मुद्दा उपस्थित केला. नागपूर शहर देशभरामध्ये हिंदू आणि मुस्लिम सलोख्याने राहतात. मात्र काही परदेशी शक्ती या एकोप्याने घाबरल्या आहेत. त्यांना नागपूरसह संपूर्ण देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगली भडकवायच्या आहेत. त्यामुळे ही मंडळी दोन धर्मामध्ये तो निर्माण करण्याचं काम करीत असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या नागपूर येथील अनेक नेत्यांनी व्यक्त केली.
पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेले घुसखोर भारतामध्ये अशांतता निर्माण करण्याचे काम करीत आहेत. अशा परकीय शक्तींनीच नागपूर सारख्या ठिकाणी दंगल घडवण्याचे काम केले, अशी टीका आता होऊ लागली आहे. त्यामुळे मोदींच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा जमा झालेल्या भाजपच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ याबाबतीत आपली भूमिका स्पष्ट केली. पाकिस्तान आणि बांगलादेशातून येणाऱ्या घुसखोरांपासून भारतातील हिंदू आणि मुस्लिम समाजाने सावध राहावे. अशी सावधगिरी बाळगली नाही तर देशातील या दोन समाजांमध्ये फूट पडली जाईल. त्यांची कत्तल केली जाईल, अशी भीती भाजपच्या अनेक पदाधिकारी, नेत्यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या वेळी व्यक्त केली.