महाराष्ट्र

PM At Nagpur : एका रोपट्याचा वटवृक्ष होईपर्यंतचा अविरत प्रवास

RSS : शंभर वर्षांपूर्वी पेरलेलं बीज आज विशाल स्वरूपात

Author

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय संस्कृतीचा अमर वटवृक्ष आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर येथील माधव नेत्रालय शिलान्यास कार्यक्रमात केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात ऐतिहासिक स्मारकांना अभिवादन करून केली. त्यांनी सर्वप्रथम रेशीम बाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केले. त्यानंतर ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र दीक्षाभूमीवर पोहोचले आणि गौतम बुद्धांच्या विचारांना अभिवादन केले. या भेटीदरम्यान त्यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले आणि सामाजिक समतेच्या दिशेने सरकारच्या कार्याचा उल्लेख केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यानंतर माधव नेत्रालयाच्या शिलान्यास समारंभाला उपस्थित राहिले. या वेळी त्यांनी नागपूरसह संपूर्ण देशातील आरोग्यसेवेच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने उचलल्या जाणाऱ्या पावलांवर प्रकाश टाकला. त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीत गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन झाली. ‘गुढीपाडवा हा नवीन ऊर्जा आणि सकारात्मकतेचा दिवस आहे, आणि नव्या संकल्पांसाठी ही योग्य वेळ आहे,’ असे मोदींनी सांगितले.

PM At Nagpur : मोदींच्या दौऱ्याने विसरभोळ्या नागरिकांना वाहतुकीचा फटका 

संघाच्या शतकपूर्तीचा गौरव

यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी संघाच्या कार्याचा गौरव करत म्हटले, ‘हे संघटनेचे केवळ शतकपूर्ती वर्ष नाही, तर सेवाकार्याने समाज परिवर्तनाचा महत्त्वाचा टप्पा आहे.’ त्यांनी डॉ. हेडगेवार आणि गुरुजींच्या कार्याचा उल्लेख करत म्हटले की, त्यांच्या विचारसरणीच्या बीजाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. लाखो स्वयंसेवक हा वृक्ष जोपासत आहेत. हा संघ भारताच्या संस्कृतीचा अभिन्न भाग आहे.

पंतप्रधानांनी संत परंपरेचाही गौरव करत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ आणि संत नामदेव यांच्या विचारांची महत्त्वता सांगितली. त्यांनी हे विचार समाजातील भेदभाव दूर करण्यास आणि एकतेला बळकट करण्यास उपयुक्त असल्याचे स्पष्ट केले. स्वामी विवेकानंद यांच्यापासून सुरु झालेल्या राष्ट्रप्रेरणेच्या प्रवाहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोठे योगदान दिल्याचे त्यांनी अधोरेखित केले. गुरु नानक, कबीरदास, संत तुकाराम, संत नामदेव आणि अन्य महान संतांनी आपल्या तत्वज्ञानाद्वारे समाजातील भेदभावाच्या भिंती मोडून टाकल्या आणि एकतेच्या सूत्रात सर्वांना गुंफले.

समाजसेवेची प्रेरणा 

मोदींनी स्पष्ट केले की, ‘संघ केवळ एक संस्था नाही, तर सेवा, त्याग आणि समर्पण यांचा संगम आहे. हा वटवृक्ष कधीही कोमेजणार नाही, कारण तो भारताच्या संस्कृतीच्या आधारावर उभा आहे.’ त्यांनी माधव नेत्रालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान संघाच्या आरोग्यसेवा कार्याचे कौतुक केले. ‘संघ बाह्य आणि आंतरिक दोन्ही दृष्टिकोनातून काम करतो. बाह्य म्हणजे माधव नेत्रालयासारख्या सुविधा आणि आंतरिक म्हणजे स्वयंसेवकांमध्ये समाजसेवेची प्रेरणा,’ असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी संघाच्या स्वयंसेवकांच्या कार्यशैलीबाबत सांगितले की, ‘स्वयंसेवक हे अनुशासित सैनिकांसारखे असतात. नैसर्गिक आपत्ती असो किंवा अन्य संकटे, ते नेहमी सेवेसाठी तत्पर असतात.’ प्रयागराज येथे महाकुंभच्या वेळी लाखो भाविकांना मदत करणाऱ्या स्वयंसेवकांचे उदाहरण देत त्यांनी संघाच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले. ‘सेवा हेच त्यांचे ब्रीद आहे. पिढ्यानपिढ्या ही परंपरा पुढे जात राहील, असे ते म्हणाले. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूरकरांना विविध उत्सवांची शुभेच्छा दिल्या आणि भारताच्या संस्कृतीच्या जतनासाठी संघाच्या भूमिकेवर भर दिला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!