
एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दर महिन्याला स्वतः वित्त विभागाला भेट देणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्रातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनप्रश्नी आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ११ एप्रिल रोजी त्यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. सरनाईक यांनी मोठ्या आत्मविश्वासाने जाहीर केले की, एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला वेळेवर मिळायलाच हवा आणि त्यासाठी ते दर महिन्याच्या पाच तारखेला स्वतः वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जाणार आहेत.
एप्रिल महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांना केवळ ५६ टक्के वेतन मिळाले होते. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आता उर्वरित वेतन मंगळवारी दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, हा प्रश्न वारंवार उद्भवत असल्याने सरनाईक यांनी ठाम भूमिका घेतली आहे. त्यांनी असेही स्पष्ट केले की, सरकारी कर्मचाऱ्यांना जसा वेळेवर पगार मिळतो, तसाच एसटी कर्मचाऱ्यांचाही पगार नियोजित वेळेत मिळायला हवा.

Harshwardhan Sapkal : फुले चित्रपटातून सत्य लपवण्याचा प्रयत्न
कष्टाचा मोबदला
सरनाईक यांनी आपल्या भाषणात रोखठोक शब्दांत सांगितले, आम्ही भीक मागत नाही, तर आमच्या कष्टाच्या मोबदल्याचा अधिकार मागतो आहोत. जर सरकारी कर्मचाऱ्यांना ठरलेल्या दिवशी वेतन दिले जाते, तर मग एसटी कर्मचाऱ्यांसाठी हीच प्रक्रिया का लागू होऊ नये? त्यांनी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांशी यापूर्वीही चर्चा केली आहे. आता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. सरनाईक पुढे म्हणाले, जे उद्या पैसे द्यायचे आहेत, ते आजच दिले गेले पाहिजेत.
एका कुटुंबाच्या महिन्याच्या खर्चाचे संपूर्ण नियोजन या वेतनावर अवलंबून असते. त्यांनी यावेळी स्पष्ट इशारा दिला की, कोणत्याही परिस्थितीत सात तारखेपर्यंत वेतन मिळालेच पाहिजे. यासाठी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून ते दर महिन्याच्या पाच तारखेला वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष हजेरी लावणार आहेत. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि इतर कर्तव्य बजावण्यासंदर्भातही त्यांनी महत्त्वाचे विधान केले.
Maharashtra : राज्याच्या विकासाला नवीन सूर, रेल्वे प्रकल्पाचा महापूर
पीएफ वापरू नका
काही दिवसांपूर्वी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना दिली की, पगार पूर्ण देऊ शकतो, पण पीएफचे पैसे उत्पन्नानुसार भरले जातील. मात्र, हा प्रस्ताव मला मान्य नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले. सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, मी आज अध्यक्ष म्हणून सही केली आहे. उद्या जर कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसे वापरण्याचा निर्णय घेतला गेला, तर मलाही जेलमध्ये जावे लागेल आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसे वापरणार नाही.
सरनाईक यांच्या या परखड भूमिकेमुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल, असे वाटते. त्यांच्या या ठाम निर्णयामुळे भविष्यात एसटी महामंडळाच्या वेतन व्यवस्थापनात सुधारणा होण्याची शक्यता आहे. आता प्रत्यक्षात त्यांच्या कृतीमुळे वेतन प्रश्न सुटतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.