
भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात आमदार राजू कारेमोरे यांना प्रफुल पटेल यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. आमदारासोबत आलेल्या सभापतींना स्टेजवर साधा सन्मानही मिळाला नाही.
भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला. जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना आमदार राजू कारेमोरे यांच्यासोबत आलेल्या चार जिल्हा परिषद सभापतींना पटेल यांनी बोलताना उल्लेख करण्याचाही सन्मान दिला नाही. पटेल यांच्या या कृतीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे नोंदणी मोहिमेला मिळणारा प्रतिसाद पक्षासाठी ऊर्जादायी असताना दुसरीकडे भाईजी यांची कृती चर्चेचा विषय ठरली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद नोंदणी कार्यक्रमादरम्यान भंडारा जिल्हा परिषदेत ज्यांनी महायुतीविरोधी भूमिका घेतली होती, त्यांना मंचावर स्थान न देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आमदार राजू कारेमोरे हे स्वतः चारही सभापतींसह कार्यक्रम स्थळी आले. पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी मात्र सगळ्यांना आपली जागा दाखवून दिली.

Harshawardhan Sapkal : संविधानाच्या नावावर ढोंगी आरत्या करणाऱ्यांना जळजळीत उत्तर
जागा दाखवली
पटेल यांनी चारपैकी कुणाचाही उल्लेख केला नाही. उलट जिल्हा परिषदेत जे झालं ते पक्ष शिस्तीच्या विरोधात असल्याचं विधान केलं. यासोबतच ज्याला दोनदा संधी मिळाली त्याला तिसऱ्यांदा संधी मिळेलच असे नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. पटेल यांच्या या भाषणातून आमदार राजू कारेमोरे यांना इशाराच देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. बदल आम्ही पण घडवू शकतो असा उल्लेख पटेल यांनी केला. यातून दोनदा संधी मिळालेल्या आमदार राजू कारेमोरे यांना बदलले जाऊ शकते, असे अप्रत्यक्षपणे प्रफुल पटेल यांनी सांगितलं.
पक्षातील नेतृत्वाच्या या निर्णयांमुळे महायुतीतील समन्वय बिघडविण्याचं काम करणाऱ्यांना वेळीच लगाम लागू शकतो, असं सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेल्या गेममुळे भाजप दुखावली होती. त्याची भरपाई भाईजींनी करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे. भंडारा जिल्हा परिषदेत जे झालं त्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या नाराजीची प्रफुल पटेल यांनी योग्यवेळी दखल घेतल्याचे त्यांच्या एकंदरीत भाषणावरून दिसले.
वेळीच ब्रेक
भंडारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापतींची निवडणूक झाली. त्यावेळी पाच सदस्यांचे गायब झाले होते. पाच सदस्य गायब हांणे ही बाब गंभीर होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार आणि भाजपच्या एका सदस्याचा समावेश होता. यामागे स्थानिक नेत्यांचा सहभाग असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र यामुळं अख्खी जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात गेली. जिल्हा परिषदेत महायुतीचं वर्चस्व असताना काँग्रेसनं सत्तेवर ताबा मिळविला. केवळ खुर्चीसाठी एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा हा प्रकार होता. यामुळं महायुतीच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता.
अशातच सदस्य नोंदणी अभियानात खासदार प्रफुल पटेल यांनी आमदार राजू कारेमोरे यांना दिलेला इशारा हा फार मोठा संकेत असल्याचं सांगण्यात येत आहे. ही केवळ एक राजकीय कृती नाही. पटेल यांनी महायुती धर्म न पाळणाऱ्यांना दिलेला संदेश आहे, अशी चर्चा आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ज्यांनी महायुतीला पाठ दाखविली त्यांना पटेल यांच्या व्यासपीठावर साधा सन्मानही ‘ऑफर’ करण्यात आल नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेतील त्यांच्याच पक्षाच्या सभापतींना मिळालेली वागणूक बरंच काही सांगून जाते. त्यातही भाईजींसारख्या हेवीवेट नेत्यानं आमदार राजू कारेमोरे यांना भाषनातून आम्हीही बदल घडवू शकतो, हा दिलेला इशारा प्रचंड महत्त्वाचा आहे. त्यामुळं कारेमोरे यांच्यासाठी हा कोणता मेसेज होता, अशी चर्चा भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे.
नाराजी कायम
भंडाऱ्यात भाजपकडून महायुती धर्माचं पालन करण्यात येत आहे. त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भाजपच्या सदस्यालाच हाताशी धरून जिल्हा परिषदेत गेम केला होता. राष्ट्रवादीच्या या सदस्यांनी जिल्हा परिषदेत खुर्ची मिळवली खरी पण त्यांच्या या कृतीमुळं त्यांना पक्षाच्या व्यासपीठावरील स्थान गमवावं लागल्याचं पटेल यांच्या नोंदणी कार्यक्रमातून दिसत आहे. जिल्हा परिषदेत जो गेम भाजपसोबत झाला, तो अद्यापही अनेक जण विसरलेले नाहीत. त्यामुळं काहींच्या बाबत अद्यापही नाराजी कायम आहे. जिल्हा परिषदेतील या गेममध्ये आमदार राजू कोरेमोरे चितपट झाल्याचे दिसून येत आहे.