
अकोल्यातील महावितरण विभाग सध्या प्रशासकीय गोंधळात अडकला आहे. अधीक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर यांच्या रजेमुळे कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे.
अकोल्यातील महावितरण विभाग सध्या एका गंभीर प्रशासकीय गोंधळात सापडला आहे. अधीक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर यांच्या प्रदीर्घ रजेने संपूर्ण व्यवस्थेचे चक्र थांबले आहे. त्यांच्या अनुपस्थितीचा फटका सर्वसामान्य जनतेला आणि महावितरणच्या कामकाजाला बसतो आहे. शंभरकर यांनी भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्याशी थेट टक्कर घेतल्यानंतर, राजकीय तणाव टाळण्यासाठी रजा वाढवून घेतल्याचं प्रशासकीय वर्तुळात सांगितलं जात आहे.
अधीक्षक अभियंता शंभरकर या सध्या नागपूर येथे बदली मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. रजा संपल्यानंतरही कार्यालयात गैरहजर राहून त्यांनी रजा धोरणाच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आणण्याचा मार्ग स्वीकारल्याची चर्चा आहे.

प्रशासकीय जबाबदारीचं ओझं
सध्या अकोल्यातील महावितरण विभागात दोन महत्त्वाच्या पदांवर अधिकारी अनुपस्थित आहेत. मुख्य अभियंता सुहास रंगारी यांच्या बदलीनंतर अनेक दिवस हे पद रिकामं होतं. अखेर मुंबई व नागपूरमध्ये कार्यरत असलेले अनुभवी राजेश नाईक यांची अकोल्यात नेमणूक करण्यात आली. मात्र, अधीक्षक अभियंता पदावर शंभरकर यांच्या अनुपस्थितीमुळे नाईक यांच्यावर तीन पदांचा कार्यभार एकत्रितपणे येऊन पडला आहे. त्यामुळे विभागातील कामकाजाचा पूर्ण बोजवारा उडाला आहे.
नाईक यांनी पदभार स्वीकारताच त्यांच्यासमोर विस्कटलेल्या प्रशासनाला पुन्हा उभं करण्याचं आव्हान उभं ठाकलं आहे. अकोला परिमंडळात अधिकारी नेमणुकीला टाळत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. यामुळे अनेक सक्षम अधिकारी ‘प्रकाशगड’मध्ये आपल्या इच्छित बदलीसाठी लॉबिंग करत असल्याचंही समोर आलं आहे.
राजकीय गणितांचा बट्याबोळ
प्रतीक्षा शंभरकर यांचा अकोल्यातील कार्यकाळ सुरू असतानाच स्थानिक राजकारणात वाद निर्माण झाला. निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजप आमदार सावरकर यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र निवडणुकीत भाजप महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले आणि ऊर्जामंत्रिपद सुध्दा मुख्यमंत्र्यांकडे गेलं. त्यामुळे शंभरकर यांचं सर्व गणित चुकलं आणि त्यांनी अकोल्यातून बदली मिळवण्यासाठी रजेचा आधार घेतला.
शंभरकर यांना नागपूरला बदली मिळवून देण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचं महावितरणच्या मुख्यालयातून सांगितलं जात आहे. मात्र, अद्याप बदली न झाल्यामुळे त्या रजेचा कालावधी वाढवत आहेत. त्यांच्या रजेवर असण्यामुळे महावितरणच्या अकोला परिमंडळातील नागरिकांना विजेच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
Rohit Pawar : दादांच्या अर्थखात्यावर आता मुख्यमंत्र्यांचा रिमोट कंट्रोल
प्रशासकीय गोंधळाचा पडदा
अकोल्यातील प्रशासन सध्या राजकीय मुरडीत अडकलं आहे. अधिकारी रजेवर, मुख्य पदं रिकामी, आणि संपूर्ण जबाबदारी एका अधिकाऱ्यावर दिल्यामुळे कार्यप्रणाली पूर्णतः ढासळली आहे. अशा परिस्थितीत सरकारचं सुशासन हे फक्त घोषणाबाजी ठरत आहे. अकोला जिल्ह्यातील नागरी सुविधांमध्ये महावितरणचं योगदान महत्त्वाचं असताना, सध्याच्या गोंधळामुळे विकासाला मोठा फटका बसतो आहे.
राजकीय अहंकार, प्रशासकीय निष्काळजीपणा आणि जबाबदारी झटकण्याची वृत्ती यांनी अकोल्यात गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. प्रतीक्षा शंभरकर यांची बदली ही आता फक्त एक प्रशासकीय बाब न राहता, ती सत्तेच्या छायेखाली घडणारी महत्त्वाची घडामोड ठरली आहे.