
सर्वोच्च न्यायालयाने वक्फ कायद्याच्या दोन वादग्रस्त कलमांना स्थगिती दिल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. त्यांनी वक्फ कायद्याला धार्मिक ध्रुवीकरणाचे साधन ठरवले असल्याचे सांगितले.
नव्या वक्फ कायद्यातील दोन वादग्रस्त कलमांना सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकाच धर्माच्या ध्रुवीकरणासाठी रचलेले हे टार्गेट कोर्टालाही जाणवले आणि म्हणूनच त्यावर ब्रेक लागला, असा स्पष्ट आरोप करत त्यांनी भाजप सरकारच्या धार्मिक राजकारणावर बोट ठेवले आहे.
वडेट्टीवार यांच्या मते, असा कायदा जो एखाद्या धर्माच्या हितासाठी खास बनवला जातो, तो भारतीय संविधानाच्या मुल्यांविरोधात आहे. केंद्र सरकारने फक्त एका धर्माची मालमत्ता, त्यांचे अधिकार, आणि त्यांना मिळणारी सोय याच अनुषंगाने कायदा बदलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे आता या कायद्याचा एकतर्फी हेतू उघड झाला आहे, असे वडेट्टीवार यांचे मत आहे.

समतोल बिघडवणारा प्रयोग
वडेट्टीवार यांनी जोरदार भाष्य करत सांगितले की, वक्फ कायदा हा सर्वधर्मसमभावाच्या मूल्यांवर घाला घालणारा आहे,अशा प्रकारच्या सुधारणांचा उपयोग केवळ निवडणुकीच्या गणितात केला जातो. देशात अनेक धर्म आहेत, पण एकाच धर्माच्या संदर्भात मालमत्तेचे वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे उर्वरित समुदायाच्या हक्कांची पायमल्ली होय.
उच्च न्यायालयाने देखील यावर ताशेरे ओढले आहेत. इतर धर्माच्या संस्थानांमध्ये दुसऱ्या धर्माच्या लोकांना अशी मुभा दिली जाते का, यावरही शंका उपस्थित केली आहे. अशा कायद्यांमुळे देशात धार्मिक तणाव वाढतो आणि लोकांमध्ये असंतोष निर्माण होतो, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
Devendra Fadnavis : निवडणूक वादात मुख्यमंत्र्यांना न्यायालयातून नोटीस
सात दिवसांची मुदत
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात केंद्र सरकारला आपले उत्तर सादर करण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर याचिकाकर्त्यांनाही उत्तर देण्यासाठी 5 दिवस मिळणार आहेत. 5 मे रोजी यावर अंतिम सुनावणी होणार आहे. त्या आधी न्यायालयाने काही महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. ते म्हणजे, वक्फ मालमत्तेची स्थिती सध्या बदलता येणार नाही, वक्फ घोषित मालमत्ता रद्द करता येणार नाही आणि वक्फ परिषदेत कोणतीही नव्याने नियुक्ती होणार नाही.
विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस पक्ष संविधानाच्या मूलभूत मूल्यांसाठी कटिबद्ध आहे. सामाजिक समता, सर्वधर्मसमभाव आणि एकात्मतेचा विचार काँग्रेसच्या धोरणांचा केंद्रबिंदू आहे. वक्फ कायद्याच्या नावाखाली केंद्र सरकार जी धार्मिक बाजू घेण्याचा प्रयत्न करत आहे, ती देशात फूट पाडण्याची रणनीती आहे. त्याचा जोरदार विरोध केला जाईल आणि न्यायालयातही या मुद्द्याला कडवा विरोध दिला जाईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले.