
उपराजधानीत बनावट शिक्षकांचा भांडा फुटल्याने नवीन माहिती समोर येत आहे. बनावट कागदपत्रांमधील व्याकरणाच्या चुका पोलिसांच्या नजरेत येताच गोंदियातील बनावट शिक्षकाला अटक करण्यात आले.
विदर्भाचे शैक्षणिक हृदय समजल्या जाणाऱ्या नागपुरात धक्कादायक शिक्षण घोटाळा उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. शालार्थ आयडीच्या नावाखाली तब्बल 580 बनावट शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात रोज नवनवीन तथ्य उलगडत आहेत. या प्रकरणामुळे शिक्षण विभागाच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. या घोटाळ्यात नवीन घडामोड म्हणून, गोंदिया जिल्ह्यातील शिक्षक महेंद्र भाऊराव म्हैसकर यांना अटक करण्यात आली आहे. म्हैसकर यांवर आरोप आहे की, त्यांनी बनावट कागदपत्रं तयार करून शिक्षक भरतीचे प्रस्ताव तयार केले आणि त्याबदल्यात पैसे उकळले.
महेंद्र म्हैसकर सध्या गोंदियातील न्यू मॉडेल स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. विचित्र बाब म्हणजे, शिक्षक असूनदेखील म्हैसकर यांनी तयार केलेल्या दस्तऐवजांमध्ये व्याकरणाच्या भल्यामोठ्या चुका आढळल्या. ज्या कोणाच्याही लक्षात येतील अशा. मात्रा, वेलांटी आणि लेटरपॅडवरील लाजिरवाण्या चुकांमुळे अखेर त्याचं भांडं फुटलं. पोलिसांनी त्यांना अटक अटक केली. अटक झालेल्या आरोपींची संख्या आता सहा झाली आहे. नागपूरमधील अनेक खासगी प्राथमिक शाळांमध्ये ही बोगस भरती करण्यात आली आहे. ज्यांची कोणालाही कल्पना नव्हती. आता या प्रकरणात दररोज नवीन ट्विस्ट समोर येत आहेत.

नियमांचे वाजले तीनतेरा
शालार्थ आयडी ही सरकारी प्रणाली चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. या स्कॅममध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनाही नागपूर सायबर सेलने अटक केली आहे. त्यांच्या सोबत वरिष्ठ लिपीक सूरज नाईक आणि अन्य आरोपींची चौकशी सुरू आहे. या घोटाळ्याची चौकशी मार्च महिन्यात सुरू झाली होती. आता ते अधिक गंभीर वळण घेत आहे. शालार्थ आयडी तयार करण्याचा अधिकार उल्हास नरड यांच्याकडे होता. पण पासवर्डचा गैरवापर कसा झाला, याबाबत सायबर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एका बाजूला रवींद्र पाटील नावाच्या कर्मचाऱ्यावर पासवर्ड गैरवापराचा आरोप आहे.
उल्हास नरड यांच्यावर या सर्व प्रकरणाच्या सूत्रधाराचा ठपका लागतो आहे. या प्रकरणातील आरोपी न्यायालयीन कोठडीत असतानाच, पोलिसांनी प्रॉडक्शन वॉरंट काढून पुन्हा ताब्यात घेतलं आहे. पुढील दोन दिवस चौकशी होणार आहे. जिल्हा परिषद भंडाऱ्याच्या शिक्षण विभागाचे काही अधिकारीही या तपासाच्या रडारवर आहेत. शालार्थ ही एक सरकारी प्रणाली आहे. ज्यामधून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नोंदणी होते. मात्र, याच प्रणालीचा गैरवापर करून बनावट शिक्षकांना पगार देण्यात आले. हे सर्व इतकं व्यवस्थित आखून केलं गेलं होतं की, कोट्यवधी रुपयांचं वेतन या बनावट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झालं.
Yavtmal : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी संजय राठोड मैदानात
शिक्षण क्षेत्रातल्या या शालार्थ स्कॅमने राज्यभरात खळबळ उडवली आहे. याचा परीणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होण्याची भीती व्यक्त होत आहे. एकीकडे शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सरकार प्रयत्न करते. मात्र दुसरीकडे अशा गैरकारभारांनी संपूर्ण यंत्रणाच बिघडते. पुढील तपासात कोणाचं नाव समोर येणार आणखी कोण अडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.