महाराष्ट्र

Nana Patole : पाच वर्षांची मेहनत घ्या, सत्ता पुन्हा आपल्या हातात

Congress :  कार्यकर्त्यांच्या मनात अजूनही मशाल पेटलेली

Share:

Author

नाना पटोले यांच्या उपस्थितीत भंडाऱ्यात काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना सत्ता मिळविण्यासाठी मेहनत करा असा आत्मविश्वास दिला.

लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीनंतर काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले होते. अनेकांना वाटले की हे यश विधानसभेतही पुन्हा दिसेल. मात्र वास्तव याच्याशी भलतेच उलटे ठरले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही, उलट पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर पक्षात वादळ उठले. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली.

काँग्रेसचा पराभव हा एकमेव धक्का नव्हता. अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षातून काढता पाय घेतला. तरीदेखील, या साऱ्यामध्ये नाना पटोले यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पाच वर्षांनंतर सत्तेत येईल, असा ठाम विश्वास व्यक्त करत पक्षात नव्या आशेचा किरण निर्माण केला आहे. विधानसभा पराभवानंतर भंडाऱ्यात काँग्रेसचा पहिला कार्यकर्ता मेळावा पार पडला. हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला भंडाऱ्याचे निरीक्षक वजाहत मिर्झा आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हजेरी लावली.

Bhandara : बनावट शालार्थ घोटाळा उघड अन् शिक्षिकांचे वेतन बंद

पदापेक्षा जबाबदारी महत्त्वाची

मेळाव्यात अनेक नाराज कार्यकर्त्यांनी आपल्या भावना उघडपणे मांडल्या. ज्या आतापर्यंत कुणाच्या ऐकिवातही नव्हत्या. महिला पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, त्यांना केवळ निवेदने देण्यासाठी वा मोर्चांमध्ये सामील होण्यासाठीच वापरले जाते. त्यांच्यावर होणारा खर्च, वाहतूक व्यवस्था, याचा विचार न करता त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकल्या जातात. निवडणुकीपुरता उपयोग न करता आम्हालाही पक्षाच्या बैठकीत सन्मान मिळावा, ही त्यांची ठाम मागणी होती. कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर नाना पटोले यांनी त्यांच्या खांद्यावर जबाबदाऱ्या टाकल्या.

एका अनुभवी नेत्याप्रमाणे मार्गदर्शन केलं. फक्त पद न देता, जबाबदारीही द्या, आणि ती पार पाडा. पक्ष संघटना बळकट करा, काँग्रेसचे विचार प्रत्येक गावात पोहोचवा, असं सांगत त्यांनी पाच वर्ष परिश्रम घ्या आणि सत्ता नक्की परत येईल, असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला. या ठिकाणी विशेष बाब अशी होती की, जे कार्यकर्ते नानांच्या नेतृत्वात असताना एकही तक्रार करत नव्हते, त्यांनीच आता मेळाव्यात मन मोकळं केलं. हे पाहता, नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी हा कार्यकर्त्यांच्या भावनेविरुद्ध गेला की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Ramdas Athawale : इतिहास विसरणाऱ्यांना इतिहास घडवता येत नाही

पराभवानंतर उभा राहणं हीच खरी चाचणी असते. सध्या काँग्रेस पक्ष जरी अडचणीत असला, तरी कार्यकर्त्यांमध्ये नव्या नेतृत्वाबद्दल उत्सुकता आणि नानांच्या आत्मविश्वासपूर्ण शब्दांमुळे आशेचा किरण नक्कीच दिसतोय.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!