
ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या युतीमागचं खरं नियंत्रण ‘मातोश्री’च्या दारात आहे, असा घणाघात नितेश राणेंनी केला आहे. राजकारणातल्या या संभाव्य भाऊबंध युतीच्या केंद्रस्थानी आता रश्मी ठाकरेंचं नाव ठळकपणे समोर येत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? या दोन्ही बंधूंच्या संभाव्य युतीची शक्यता सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. परंतु या युतीमागे खरी सत्ता कोणाच्या हातात आहे. यावरून भाजप आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील मंत्री नितेश राणेंनी थेट ‘मातोश्री’वर बोट ठेवलं आहे.
राज आणि उद्धव पुन्हा एकत्र येण्याचा सूर अलीकडील काही मुलाखतींमधून उमटत असतानाच नितेश राणेंनी या चर्चेवर जोरदार आणि वादग्रस्त विधान करून राजकीय वातावरण आणखी तापवलं आहे. एका मुलाखतीदरम्यान राज ठाकरे यांनी स्पष्ट संकेत दिले की, भूतकाळातील मतभेद विसरून बंधू उद्धव ठाकरेंसोबत एकत्र यायला ते तयार आहेत. झाले ते झाले, मोठ्या गोष्टींच्या तुलनेत आमच्यातील मतभेद फारच किरकोळ आहेत. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी एकत्र येणं मला कठीण वाटत नाही. हे सगळं इच्छेवर अवलंबून आहे, असं सूचक विधान राज ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरे यांनीदेखील राज ठाकरेंबाबत सकारात्मक भूमिका मांडली. “काही जुने वाद असतीलही, पण जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणं गरजेचं असेल, तर मी तयार आहे. मात्र, राज यांनी यापुढे महाराष्ट्राच्या शत्रूंच्या सोबत बसू नये, अशी अटही उद्धव ठाकरे यांनी ठेवली.

सूत्र वहिनींच्या हातात
राज-उद्धव यांच्या युतीच्या पार्श्वभूमीवर सर्व चर्चांमध्ये खऱ्या सूत्रधारांची ओळख पटवताना नितेश राणेंनी एक धक्कादायक दावा केला. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना उत्तर देण्याआधी रश्मी वहिनींची (उद्धव ठाकरे यांच्या पत्नी) परवानगी घेतली होती का, हे विचारलं पाहिजे. राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या निर्णयांमागे खरा प्रभाव रश्मी ठाकरे यांचाच आहे. राज ठाकरेंबरोबर जाण्याची इच्छा उद्धव ठाकरेंना आहे का, की घरातून विरोध आहे? हे स्पष्टपणे विचारायला हवं, असं राणेंनी म्हटलं. आम्ही शिवसेनेला जवळून पाहिलंय. आज निर्णय कोणी घेतात, हे सर्वांना माहिती आहे, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे रश्मी ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्तक्षेपावर बोट ठेवलं.
सर्वाधिक चर्चेत असलेल्या वक्तव्यांपैकी एक म्हणजे, नितेश राणेंनी थेट ‘वैभव चेंबर्स’चा उल्लेख केला. महाविकास आघाडीचं सरकार कोण चालवत होतं? मातोश्रीपासून दहा मिनिटांवर असलेल्या वैभव चेंबर्समध्ये आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांची रांग का लागायची? तिथे रश्मी ठाकरे आणि श्रीधर पाटणकर सर्व गोष्टी ठरवायचे. हे सर्वांना माहीत आहे, आम्ही फक्त ते उघडपणे सांगतो, असं राणे म्हणाले. शेवटी नितेश राणे यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार की नाही हे निर्णय रश्मी ठाकरेंच्या इच्छेवर अवलंबून आहे. सर्व जुने शिवसैनिक हे जाणून आहेत.
संपूर्ण घडामोडींमधून हे स्पष्ट होतंय की, राजकारणातले निर्णय केवळ व्यासपीठावर घेतले जात नाहीत. नातेसंबंध, कुटुंबीयांचा प्रभाव, आणि अंतर्गत समीकरणं हे सगळं त्यामागे कार्यरत असतं. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, हा प्रश्न जरी चर्चेचा असला तरी नितेश राणेंनी उपस्थित केलेले मुद्दे मात्र खळबळजनक आहेत. पुढील काही दिवसांमध्ये या चर्चेला कोणती दिशा मिळते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.