
जिगांव प्रकल्प हा विदर्भातील महत्वाचा जलसिंचन प्रकल्प आहे. त्याच्या पूर्णत्वासाठी शासन प्रयत्नशील आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकल्पातील अडथळे दूर करून 29 एप्रिल रोजी आढावा बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगांव प्रकल्पाला पुन्हा गती देण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला आहे. अवर्षणग्रस्त विदर्भातील हा महत्वाकांक्षी प्रकल्प शेतीच्या वाढीसाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या शाश्वत स्रोतासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी सरकारकडून अधिकृत हालचाली सुरु झाल्या आहेत.
मुंबईत येत्या 29 एप्रिल रोजी जिगांव प्रकल्पाच्या सविस्तर आढाव्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. महसूलमंत्री बावनकुळे यांनी संबंधित विभागांना याबाबत सूचना दिल्या आहेत. यामधील अडथळे दूर करून लवकरच प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न होणार आहे.

Amravati : नागपूर, गोंदियानंतर आता अमरावतीतही थांबतील सिग्नल
जलसिंचनाला नवी दिशा
जिगांव प्रकल्प हा बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील अनेक गावांसाठी जीवनदायिनी ठरणार आहे. विशेषतः खारपाण व आत्महत्याग्रस्त पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प आशेचा किरण बनला आहे. शेती उत्पादनात वाढ, पिण्याचे शाश्वत पाणी, तसेच औद्योगिक वापरासाठीही पाणी उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे.
सदर नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीत महसूलमंत्री बावनकुळे यांच्या समोर जिगांव प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये प्रकल्पाची सद्यस्थिती, भूसंपादन, पुनर्वसन, तसेच यंत्रणांमधील समन्वय यावर सविस्तर चर्चा झाली. अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी किरण पाटील, सहआयुक्त वैशाली पाथरे, विधी सेवा समितीचे सचिव अनिलकुमार शर्मा आणि जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाचा संकल्प
जिगांव प्रकल्पाचे काम अडथळ्यांमुळे रखडले आहे. असे असले तरी आता महसूलमंत्री बावनकुळे यांच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे नव्याने दिशा मिळाली आहे. नियमानुसार अडथळे दूर करून या महत्वाकांक्षी प्रकल्पास पूर्णत्वास नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. जलसंपदा विभागाला दिलेल्या सूचनांनुसार येत्या काळात प्रकल्पाच्या विविध टप्प्यांवर गती दिली जाणार आहे. हा प्रकल्प विदर्भाच्या समृद्धीसाठी एक ठोस पाऊल ठरणार आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली शासन आणि प्रशासन एकत्रितपणे विदर्भाच्या जलसिंचन स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले. प्रकल्पाच्या अंमलबजावणीला नवे बळ मिळाल्याने नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली आहे. विदर्भाच्या भविष्याच्या दृष्टीने जिगांव प्रकल्प हा परिवर्तनाचा टप्पा ठरणार आहे, यात शंका नाही.