महाराष्ट्र

Sanjay Gaikwad : महाराष्ट्रात गुन्हेगार हसतात अन् पोलिस गप्प बसतात 

Maharashtra : शिंदे गटाचे आमदाराचा प्रशासनावर घणाघात 

Share:

Author

आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर थेट हल्ला चढवला. जेव्हा स्वतःच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं, तेव्हा गायकवाड यांनी पोलिसांवरच आरोपांचे बाण सोडले. त्यांच्या संतप्त वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

नेहमीच आपल्या रोखठोक आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडवणारे विधान केले आहे. त्यांनी थेट महाराष्ट्र पोलिसांवरच गंभीर आरोप करत सांगितले की, जगात जर कुठे सर्वांत अक्षम विभाग असेल, तर तो म्हणजे महाराष्ट्र पोलीस आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

गायकवाड यांनी आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत आपल्या भावना मोकळेपणाने मांडल्या. त्यांनी सांगितले, माझ्या मुलाला अलीकडेच एक धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रामुळे माझ्या कुटुंबियांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु त्यापूर्वीही माझ्या गाडीला अपघात घडवण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी अजूनही नीट चौकशी केली नाही. आरोपी आजही मोकाट फिरत आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, कारचा अपघात साध्या अपघातासारखा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु प्रत्यक्षात ते नियोजित कटाचेच एक रूप होते. “मी स्वतः या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी म्हणून प्रयत्न केला, परंतु पोलिस प्रशासनाने केवळ औपचारिकतेपुरती कारवाई करून प्रकरणावर पडदा टाकला, असा आरोपही त्यांनी केला.

सौदेबाजीचा आरोप

संजय गायकवाड म्हणाले की, महाराष्ट्र पोलिसांमध्ये जर खरंच प्रामाणिकपणा असता आणि त्यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली असती, तर आज राज्यातील आणि देशातील बराचसा गुन्हेगारीचा गाळ साफ झाला असता. परंतु येथे उलट चित्र आहे. कुठलाही नवीन कायदा आला की पोलिसांचा हफ्ता वाढतो, गुटख्यावर बंदी आली की हफ्ता वाढतो, दारूबंदी झाली की अवैध दारू विक्रीसाठी हफ्ता वाढतो. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, महाराष्ट्र पोलीस गुन्हेगारांशी सौदेबाजी करत आहेत. सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेबाबत त्यांना काहीही देणे-घेणे नाही. गायकवाड यांच्या या रोखठोक विधानामुळे आता सरकार आणि पोलीस विभागावर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

Prataprao Jadhav : वडाळीच्या जलसमाधी आंदोलनाने हादरलं बुलढाणा

संजय गायकवाड यांनी जाहीरपणे हा संशय व्यक्त केला आहे की त्यांच्या मुलाला आलेल्या धमकीच्या पत्रामागे मोठे षड्यंत्र असू शकते. त्यांनी सांगितले की, पत्रामध्ये त्यांच्या कुटुंबियांचे आयुष्य धोक्यात घालण्याची थेट भाषा वापरण्यात आली आहे. हे पत्र साधारण गुंडांकडून नाही तर नियोजित गटाकडून आलेले वाटते. यामध्ये कोणत्यातरी मोठ्या राजकीय अथवा आर्थिक फायद्याचा डाव असू शकतो, असेही ते म्हणाले. गायकवाड यांनी राज्य शासनाला आणि पोलीस महासंचालकांना पत्र लिहून तातडीने सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

संजय गायकवाड यांच्या या स्फोटक आरोपांनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षांनीही पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गायकवाड यांच्या आरोपांची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. यामुळे राज्य सरकारवर आता मोठा दबाव येण्याची शक्यता आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!