
बुलढाण्यात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलढाण्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. नेहमी आपल्या रोखठोक शैलीसाठी चर्चेत असलेले शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर आता पोलिसांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे गुन्हा दाखल झाला आहे. बुलढाणा शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 296, 352 व पोलीस अधिनियम 1922 मधील कलम 3 नुसार गायकवाड यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुलढाण्यात कार्यकर्ता आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवरच संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

यंत्रणेवर गंभीर आरोप
संजय गायकवाड यांनी एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्र पोलिसांवर थेट गंभीर आरोप केले. जगातील सर्वांत अक्षम पोलिस विभाग जर कोणी असेल, तर तो म्हणजे महाराष्ट्र पोलीस, असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. त्यांच्या या वक्तव्यामुळे पोलिस यंत्रणेचा अवमान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गायकवाड यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करत सांगितले की, अलीकडेच त्यांच्या मुलाला धमकीचे पत्र मिळाले. या घटनेने त्यांच्या कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही त्यांच्या वाहनाला अपघात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी योग्य ती चौकशी केली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
Amol Mitkari : देश दुःखात, पण काँग्रेस अजूनही स्वतःच्याच गोंधळात
संजय गायकवाड यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच संशय व्यक्त करत सांगितले की, गुन्हेगारी घटकांशी सौदेबाजी करणारे पोलीस अधिकारी राज्यात मुजोर झाले आहेत. गुटखा, दारूविक्रीसारख्या अवैध व्यवहारांमध्ये पोलिसांचा सहभाग वाढत चालला आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. पोलिसांची निष्क्रियता आणि सौदेबाजीमुळे सामान्य जनतेच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. ते पुढे म्हणाले की, जर पोलिसांनी खरी आणि निःपक्ष कारवाई केली असती, तर आज राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले असते. मात्र सध्याच्या परिस्थितीत गुन्हेगारांशी हातमिळवणी करून पोलिसांनी स्वतःची प्रतिमा मलिन केली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
राजकीय उलथापालथीची शक्यता
संजय गायकवाड यांच्या या विधानांमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आणि राज्याच्या राजकारणात नवीन उलथापालथी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पोलीस विभागावरील अविश्वासाचा सूर आणि प्रशासनातील कारभारावर उघडपणे केलेल्या टीकेमुळे आगामी काळात सरकारला अडचणीत आणणाऱ्या घडामोडी घडू शकतात. गायकवाड यांच्या या प्रकरणामुळे एकनाथ शिंदे गटाच्या अंतर्गतही अस्वस्थता निर्माण झाल्याची कुजबुज सुरू आहे. त्यामुळे बुलढाण्यातील आगामी राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.