महाराष्ट्र

Yavatmal : शाळा झाली रणभूमी, महाराष्ट्र दिनी शिक्षकाच्या दुचाकीची होळी

Maharashtra Day : ध्वजारोहण कार्यक्रम पार पडल्यानंतर केली बेदम मारहाण

Author

बेलोरा गावात महाराष्ट्र दिनाच्या उत्सवाऐवजी गोंधळ उडाला, कारण शाळेतील मुख्याध्यापकांवर संतप्त ग्रामस्थांचा राग उसळला. आरोप होते विद्यार्थ्यांशी गैरवर्तनाचे, आणि शिक्षा मिळाली थेट जमावाकडून.

यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा गावात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी एका धक्कादायक घटनेने खळबळ उडवून दिली आहे. जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांशी केलेल्या कथित गैरवर्तणुकीमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्याला शाळेच्या आवारातच बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे, तर संतप्त जमावाने त्यांच्या दुचाकीला देखील आग लावून ती जाळून टाकली. ही घटना यवतमाळ तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुख्याध्यापक पुरुषोत्तम मंडलिक यांच्यावर काही पालकांनी विद्यार्थ्यांशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप करत थेट ध्वजारोहण कार्यक्रमानंतर वाद घातला. त्यानंतर बघता बघता मोठा जमाव शाळेच्या आवारात जमा झाला आणि त्यांनी मुख्याध्यापकावर हल्ला चढवला. संतप्त जमावाने शिक्षकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत गावात मोठा गोंधळ निर्माण केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत मुख्याध्यापकाला जमावाच्या तावडीतून सुखरूप बाहेर काढले. मात्र, जमावाने यावरच समाधान न मानता त्यांच्या दुचाकीला आग लावून ती जाळून टाकली. या आगीत दुचाकी पूर्णतः भस्मसात झाली आहे.

BJP : जे फक्त मागणी करत राहिले, त्यांनी आता मौन धरले

पोलिस बंदोबस्त

सध्या या प्रकरणी कोणतीही तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आलेली नसली, तरी पोलीस विभागाने गावात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दंगा नियंत्रण पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. शाळा परिसर पोलीस छावणीसारखा भासत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालकांकडूनही अद्याप कुठलीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. या घटनेनंतर शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक पालकांनी त्यांच्या मुलांना काही काळ शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही समोर येत आहे.

पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मुख्याध्यापकावर लावण्यात आलेले आरोप, ग्रामस्थांचा संताप, व परिसरातील सामाजिक वातावरण या सर्व घटकांची बारकाईने चौकशी केली जात आहे. प्रशासनाने शांतता राखण्याचे आवाहन केले असून, गावात सध्या सतर्कतेचा माहौल आहे. ही घटना शिक्षक व विद्यार्थी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित करत असून, शिक्षण संस्थांमध्ये अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याकडे शासनाचे लक्ष वेधले जात आहे.

Prakash Ambedkar : शिंदे–पवार सावध व्हा, अजगर गिळून टाकेल

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!