
देशात सायबर गुन्हेगारीने नवीन रुप घेतले असून, आता पोलीस आयुक्तांच्याच नावाने फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. अमरावतीत फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून सीपी नवीन चंद्र रेड्डी यांच्या नावाने नागरिकांकडून पैसे मागण्यात आले.
राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात ऑनलाईन फसवणूक, बनावट खाते तयार करून लोकांना गंडवण्याच्या घटनांना झपाट्याने वेग येत आहे. सोशल मीडिया ही संवादाची एक प्रभावी साधने झाली असली तरी काही गुन्हेगार त्याचा गैरफायदा घेत आहेत. खोट्या नावाने, अधिकाऱ्यांच्या किंवा प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाने खाते तयार करून नागरिकांना फसवण्याचे प्रकार वाढले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमरावती शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अमरावती शहरात पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या नावाने एक फर्जी फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले. त्या खात्याचा वापर करून काही लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आल्या आणि काहींकडून थेट पैसे मागण्यात आले. संशयास्पद गोष्टी लक्षात आल्यावर या प्रकाराची चौकशी सुरू झाली आणि सायबर पोलिसांनी तत्काळ तपास करून आरोपीचा शोध घेतला.

फेसबुक स्कॅम
चौकशीतून समोर आले की, हा फसवणूक करणारा सायबर गुन्हेगार राजस्थानचा रहिवासी आहे. त्याने आयुक्त रेड्डी यांच्याच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करून 30 एप्रिल रोजी अमरावतीतील चार ते पाच नागरिकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या. काही नागरिकांना त्या खात्यावरून मेसेजही आले. ठीक आहे सर,असा उत्तर दिल्यानंतर आरोपीने काहींकडून त्यांचे मोबाईल नंबर मागितले.
खास गोष्ट म्हणजे, आरोपीने पोलीस आयुक्त असल्याचे भासवून, सीआरपीएफमधील माझ्या मित्राचा ट्रान्सफर झाला आहे, त्याचे फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशीन विकायचे आहेत, असे सांगून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. काही सतर्क नागरिकांना यावर शंका आली आणि त्यांनी हा प्रकार थेट पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या निदर्शनास आणून दिला. सायबर पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीचा तपास सुरू केला. माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये (IT Act) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सायबर क्राइम विभागाच्या सतर्कतेमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक टळली.
सायबर धोका
फसवणुकीची ही घटना म्हणजे सोशल मीडियाचा सावध वापर का करावा, याचे ठळक उदाहरण आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट, मेसेजेस यांची खातरजमा केल्याशिवाय प्रतिसाद देऊ नये. विशेषतः जेव्हा त्या खात्यातून पैसे मागण्यात येतात किंवा वैयक्तिक माहिती मागितली जाते, तेव्हा सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. देशात अशा सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत असताना, सरकारकडून यावर कठोर उपाययोजना राबवण्याची मागणी होत आहे. सट्टा, ड्रग्सची तस्करी, बनावट ओळखी, ऑनलाईन फसवणूक या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी डिजिटल सिक्युरिटी व सायबर कायद्यात सुधारणा आवश्यक आहे.
Maharashtra : लाडक्या बहिणींसाठी निधी वळवला; मंत्री म्हणतात, खातेच बंद करा
अशा घटनांवरून हे स्पष्ट होते की, सायबर गुन्हेगार आपली ओळख लपवून सोशल मीडियाचा वापर करून नागरिकांना लुटण्याचे नवे मार्ग शोधत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर कुठल्याही व्यक्तीशी संवाद साधताना किंवा कोणतीही माहिती शेअर करताना खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सतर्कता हीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे.