महाराष्ट्र

Central Government : पाकच्या दिशेने व्यापारी दरवाजे बंद

Pahalgam attack : भारत सरकारचं राष्ट्रहितासाठी रणनितीपूर्ण पाऊल

Author

भारत सरकारने पाकिस्तानवर पूर्ण आयात बंदी घालून मोठा निर्णय घेतला आहे. आता पाकिस्तानमधून कोणतीही वस्तू देशात येणार नाही, ही बंदी तात्काळ लागू झाली आहे.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि राष्ट्रीय हिताच्या रक्षणासाठी भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध निर्णायक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तूंवर आता भारतात पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी थेट आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारांच्या व्यापारावर लागू करण्यात आली आहे. 2 मे रोजी वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेद्वारे हे आदेश जाहीर करण्यात आले. या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक आणि धोरणात्मक धक्का बसणार आहे.

भारताच्या परराष्ट्र व्यापार धोरणात (FTP 2023) नव्याने तरतूद करून ही बंदी लागू करण्यात आली आहे. दहशतवादाला अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या देशाविरुद्ध भारताने आघाडीची भूमिका घेत निर्णायक कारवाई केली आहे. भारताच्या भूमीत पाकिस्तानमधून कोणतीही वस्तू येणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

Amravati : फ्रेंड रिक्वेस्ट आली ‘सर’कडून, पण सर निघाला सरकस 

सागरी मार्गांवरही नियंत्रण

भारत सरकारने पाकिस्तानमधून येणाऱ्या वस्तूंच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आयातीवर तसेच निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. ही बंदी केवळ थेट व्यापारापुरती मर्यादित नाही. तर तिसऱ्या देशांमार्गे येणाऱ्या पाकिस्तानी वस्तूंवरही लागू होणार आहे. मुक्तपणे आयात होणाऱ्या किंवा परवाना असलेल्या वस्तूंनाही यामध्ये सामील करण्यात आले आहे. ही बंदी पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार आहे. या संदर्भात DGFT म्हणजे परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने अधिसूचना काढत स्पष्ट केले की, अशा कोणत्याही व्यवहारासाठी भारत सरकारची विशेष परवानगी आवश्यक असेल.

भारत सरकारने फक्त व्यापारपुरतेच नव्हे, तर सागरी मार्गाने येणाऱ्या पाकिस्तानी जहाजांवरही बंदी घातली आहे. 1958 मधील व्यापारी जहाज कायद्यानुसार, भारताच्या जहाजबांधणी महासंचालनालयाने पाकिस्तानी ध्वजधारी जहाजांना कोणत्याही भारतीय बंदरात येण्यास मनाई केली आहे. तसंच भारतीय ध्वजधारी जहाजांनाही पाकिस्तानच्या बंदरांमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे. या निर्णयाचा उद्देश राष्ट्रीय सागरी सुरक्षेला बळकट करणे आणि भारताच्या सागरी पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे आहे.

Maharashtra : लाडक्या बहिणींसाठी निधी वळवला; मंत्री म्हणतात, खातेच बंद करा

दहशतवादाला आर्थिक फटका

व्यापारबंदी लागू होण्याआधी भारत पाकिस्तानला कापूस, औषधे, मसाले, रसायने, अन्नधान्य यांसारख्या वस्तू निर्यात करत असे. यासोबतच कांदे, टोमॅटो, लोखंड, साखर, मीठ आणि ऑटो पार्ट्स याही वस्तू तिसऱ्या देशांमार्गे पाकिस्तानात जात असत. परंतु या सगळ्यावर आता पूर्णविराम लागला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या उद्योगधंद्यांवर थेट परिणाम होणार आहे. पाकिस्तानमधून भारतात येणारी आयात आधीच 2019 नंतर जवळजवळ शून्यावर आली होती. 2024 मध्ये ही आयात केवळ 4.8 दशलक्ष डॉलर्स इतकीच होती. यामध्येही सैंधव मीठ, मुलतानी माती यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंचा समावेश होता. आता तीदेखील पूर्णपणे थांबली आहे.

नियंत्रण रेषेवरून 2019 पूर्वी होणारा व्यापार सुमारे 7 हजार 500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता. पण पुलवामा हल्ल्यानंतर भारताने हा मार्ग बंद केला होता. कारण या मार्गाचा वापर बेकायदेशीर शस्त्र, नकली चलन आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी होत असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी उघड केले होते. त्यामुळे या कारवाया रोखण्यासाठी सरकारने आता अप्रत्यक्ष व्यापाराचेही मार्ग बंद केले आहेत. पाकिस्तानप्रती भारताची ही कणखर भूमिका म्हणजे देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा संकल्प दृढ करण्याचे एक ठोस उदाहरण आहे. केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय दहशतवादाला दिलेला आर्थिक आणि व्यापारी झटका ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!