
नागपूर शहरात खळबळ उडवणाऱ्या अपहरणप्रकरणात बेलतरोडी पोलिसांनी अवघ्या एका तासात पाच वर्षांच्या मुलीला सुखरूप सोडवून गुन्हेगाराला जेरबंद केले. खंडणीसाठी चिमुकलीचं अपहरण करणाऱ्या आरोपीचा थरारक पाठलाग आणि अचूक सापळा ही पोलिसांच्या शौर्यगाथेची जिवंत मिसाल ठरली.
शहरात खळबळ उडवणाऱ्या एका पाच वर्षांच्या चिमुरडीच्या अपहरणप्रकरणाचा थरार केवळ एका तासात संपवून, बेलतरोडी पोलिसांनी तिचे अपहरण करणाऱ्या गुन्हेगारास ताब्यात घेतले. ही कारवाई इतकी वेगवान आणि काटेकोर होती की गुन्हेगाराला सावरायलाही वेळ मिळाला नाही. पोलिसांच्या जलद हालचालीमुळे वर्धा रोडवरून पळवून नेलेली मुलगी सुखरूप आईच्या कुशीत परतली.
हिंगणा परिसरात राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेची पाच वर्षांची मुलगी आरोपीने अपहरण करून, तिला परत मिळवण्यासाठी तब्बल 20 हजार रुपयांची खंडणी मागितली होती. ही घटना उघडकीस येताच बेलतरोडी पोलिस ठाण्याने तात्काळ पथक तयार करून तपास सुरु केला.

आरोपीने खंडणीसाठी बुटीबोरी येथे बोलावले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि अत्यंत कुशलतेने आरोपीला अटक केली. आरोपी सूर्या उर्फ मिलिंद बघेल (वय 29, रा. बुटीबोरी) याच्यावर यापूर्वीही खून व गंभीर गुन्ह्यांचे अनेक खटले दाखल आहेत. तो ‘क्राइम चार्ट’वरील सक्रिय गुन्हेगार आहे.
तुफानी सर्जिकल स्ट्राइक
आरोपीकडून मुलीला सुखरूप सोडवण्यात आले आहे. त्याचा पुढील तपास सुरू आहे. ही थरारक आणि कौशल्यपूर्ण कारवाई परिमंडळ क्रमांक चार मधील पोलीस उपायुक्त रश्मिता राव एन, सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गोरडे, पीएसआय नारायण घोडके, पीएसआय मनोज गबने तसेच पोलीस अंमलदार विवेक श्रीपाद, सचिन देव्हारे, अतुल माने आणि अंकुश चौधरी यांनी एकत्रितपणे केली. या प्रकरणात केवळ एका तासात खंडणी मागणाऱ्या आरोपीस पकडणे हे केवळ पोलिसांच्या अचूक नियोजन, तत्परता आणि एकजुटीचे उत्तम उदाहरण ठरले आहे. या घटनेनं नागपूर शहरात पोलिसांबद्दलचा विश्वास पुन्हा एकदा बळकट केला आहे.
Washim : मागासतेतून मुख्य प्रवाहात, वाशिमच्या वाटचालीला नवा जोश
यशस्वी कामगिरी
नागपूर शहरातील गुन्हेगारी हळूहळू कमी होत आहे. शहरातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या नागपूर पोलिसांनी आणखी एक मोलाचा टप्पा गाठला आहे. परिमंडळ चार अंतर्गत एप्रिल 2024 आणि एप्रिल 2025 मधील कालावधीत गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. एकूण 946 गुन्ह्यांच्या तुलनेत फक्त 773 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. म्हणजेच 173 गुन्ह्यांची घसरण पोलिसांच्या यशस्वी उपाययोजनांचे स्पष्ट द्योतक ठरते.
प्राप्त झालेले हे यश केवळ पोलिसांचे नाही तर नागरिकांचाही त्यात मोठा सहभाग आहे. पोलिस प्रशासनाने सांगितले आहे की, येत्या काळात देखील या धोरणांचा विस्तार करून गुन्हेगारी पूर्णपणे नियंत्रणात आणण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, तपास प्रक्रियेत पारदर्शकता, आणि ठोस कार्यवाही हे यापुढील काळात प्राथमिकता असतील.
पोलिस आयुक्त रजनीश सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 4 मधील अधिकारी, सर्व पोलीस ठाण्यांचे निरीक्षक, कर्मचारी, तपास पथके यांनी संयुक्तपणे ही कामगिरी साध्य केली आहे. नागपूर परिमंडळ चार मधील हे यश संपूर्ण शहरासाठी अभिमानास्पद आहे. सुरक्षित नागपूर घडवण्यासाठी पोलिस आणि जनतेच्या एकत्रित प्रयत्नांची ही जिवंत उदाहरण ठरली आहे.