महाराष्ट्र

Devendra Fadnavis : पर्यटनात शक्ती, विकासात भक्ती

Maharashtra : योजनांच्या पाठीमागे गडद धोरण

Author

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात देशात पहिल्या क्रमांकावर नेण्याचा संकल्प व्यक्त केला. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार, संस्कृती आणि विकासाचा नवा मार्ग मोकळा करण्याचा त्यांचा दृढ निर्धार आहे.

पर्यटन म्हणजे केवळ प्रवास नव्हे, तर रोजगार, संस्कृती आणि प्रगतीचा मार्ग आहे, असे स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते महाबळेश्वर येथे झालेल्या ‘महापर्यटन उत्सव-2025’ मधील समारोपप्रसंगी बोलत होते. पर्यटन क्षेत्राच्या भव्यतेची दिशा ठरवणाऱ्या या कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्राला पर्यटनाच्या शिखरावर नेण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली.

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रासारख्या राज्यात नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक विविधतेचा अनमोल ठेवा आहे. 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा, सुंदर घाट प्रदेश, पवित्र तीर्थक्षेत्रे हे सर्व जगासमोर प्रभावीपणे मांडले पाहिजे. त्यांनी पर्यटनाच्या एकात्मिक डिजिटल पोर्टलची कल्पना मांडत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा विचार मांडला. मुख्यमंत्र्यांनी पुढे सुचवले की, वर्षभर चालणाऱ्या उत्सवांच्या स्वरूपात विविध भागांतील पर्यटनस्थळांचे ब्रँडिंग करणे गरजेचे आहे. तसेच, देशभरातील टूर ऑपरेटरसाठी कार्यशाळा घेऊन महाराष्ट्रातील सुविधांची माहिती देणे महत्त्वाचे ठरेल.

Nagpur Police : एका तासात संपवला अपहरणकर्त्याचा खेळ 

नवे गिरीस्थान, नवे पर्यटनदृष्टीकोन

महाबळेश्वरसारख्या स्थळांचा देशभर प्रभावी प्रचार-प्रसार होणे गरजेचे आहे. ते नवे गिरीस्थान म्हणून विकसित करण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुढील महोत्सव कोयना बॅकवॉटर परिसरात होणार असून तेथे जलक्रीडा आणि स्थानिक संस्कृतीचे सादरीकरण करण्यात येणार आहे. स्कुबा डायव्हिंगसारख्या नवकल्पनांमुळे पर्यटनात नवसंजीवनी निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उद्योग गुंतवणुकीपेक्षा कमी खर्चात, पर्यटन क्षेत्र अधिक रोजगार निर्मिती करू शकते, असे सांगत फडणवीस यांनी पर्यटनाच्या संभाव्य क्षमतेवर भर दिला. महाराष्ट्रात पर्यटन पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी पुढील पाच वर्षांत नियोजनबद्ध प्रयत्न होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महापर्यटन उत्सवाचा समारोप एक भव्य सोहळा ठरला. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मंत्री, आमदार आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वरच्या अमर्याद पर्यटन क्षमतेचा उल्लेख करताना सांगितले, निसर्ग, कला, संस्कृती, इतिहास आणि खाद्यसंस्कृती यांचा संगम इथे आहे. इथले भूमिपुत्र पर्यटनाच्या माध्यमातून उन्नती करू शकतात. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले की, हा महोत्सव दरवर्षी राज्यातील विविध विभागांमध्ये आयोजित केला जाईल. कोयनेच्या बॅकवॉटरमध्ये भव्य पर्यटन आराखडा उभारण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे.

Washim : मागासतेतून मुख्य प्रवाहात, वाशिमच्या वाटचालीला नवा जोश 

आर्थिक प्रगतीचा मंच

या तीन दिवसांच्या महोत्सवात 75 हजार पेक्षा अधिक पर्यटकांनी सहभाग घेतला. शिवकालीन शस्त्रप्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, खाद्य जत्रा, ड्रोन व लेझर शो, हेलिकॉप्टर राईड्स, लोककला कार्यक्रम यांसारख्या विविध उपक्रमांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. स्थानिकांच्या सक्रिय सहभागामुळे महोत्सव अधिकच संस्मरणीय ठरला. या महोत्सवाने पर्यटन म्हणजे केवळ प्रवास नाही, तर एक सर्वांगीण सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा मंच असल्याचे अधोरेखित केले. या प्रवासाचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत असल्यामुळे महाराष्ट्र पर्यटनाच्या नवयुगात प्रवेश करत आहे.

महापर्यटन उत्सवात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित राहिले. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद उपस्थित सर्व स्तरांमध्ये प्रकर्षाने घेतली गेली. कार्यक्रमात राज्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती असताना पवारांचा गैरहजेरीमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अलीकडेच अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतच्या त्यांच्या आकांक्षा जाहीरपणे व्यक्त केल्या. त्यामुळे त्यांच्या या अनुपस्थितीकडे केवळ वैयक्तिक कारण म्हणून न पाहता, त्यामागे काही राजकीय संकेत आहेत का, याबाबत चर्चांना वेग आला आहे. विरोधकांसह सत्ताधारी गटांतही यावर खलबते सुरू आहेत. त्यांच्या अनुपस्थितीचा आता पुढील राजकीय घडामोडींवर काय परिणाम होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!