महाराष्ट्र

BJP : बावनकुळे यांचा ब्लूप्रिंट बाहेर, मिशन ‘रिकामी काँग्रेस’ सुरू

Chandrashekhar Bawankule : मिश्किल मोहीम अन् राजकीय डाव दोन्ही एकदम

Author

राजकारणाच्या रंगमंचावर आता केवळ बोलण्याचं नव्हे, तर थेट कृतीचं युग सुरू झालं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला फोडण्याचं मिशन जाहीर करत राजकारणात नवा मोर्चा उघडला आहे.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यांना उद्देशून केलेले भाषण म्हणजे निव्वळ राजकीय भाषण नव्हे, तर एका मिशनची सुरुवातच होती. ‘सांगायला गेलं तर सल्ला आणि ऐकायला गेलं तर आदेश’ अशा शैलीत बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना मंत्र दिले आणि विरोधकांना स्पष्ट इशाराही दिला. तयार राहा, आमचा डाव फसवणं आता अशक्यच.

राजकीय नकाशा बदलण्याच्या तयारीत असलेल्या भाजपने पुणे जिल्ह्याला विशेष लक्ष केंद्रस्थानी ठेवले आहे. बावनकुळे म्हणाले, “आज जिल्ह्याची बैठक पार पडली, आणि या बैठकीत प्रत्येक कार्यकर्त्याला एका सैनिकासारखी भूमिका निभावण्याची प्रेरणा दिली आहे. पुढील काळात पक्ष संघटन अधिक मजबूत करून केंद्र व राज्य सरकारच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवाव्यात, ही आपली जबाबदारी आहे.

Devendra Fadnavis : पर्यटनात शक्ती, विकासात भक्ती

नवी यादी

महसूल मंत्री बावनकुळे पुढे म्हणाले, पुणे जिल्हा म्हणजे आमचा राजकीय बालेकिल्ला बनवायचाय. येत्या एका महिन्यात महामंडळामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या होणार आहेत. सरकार लवकरच नवी यादी जाहीर करेल. कानमंत्र देणाऱ्या काळात आपण नव्हतो, आणि आता तर गरजच नाही. पुढची 15 वर्षे महायुतीचं सरकार राहणार, हे पक्कं. भाजपमध्ये इतर पक्षातील नेत्यांचा प्रवेश सुरू आहे. त्यामध्ये काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) यांचं विशेष स्थान आहे. बावनकुळे म्हणाले, संग्राम थोपटे यांना सगळं देऊनही काँग्रेस टिकवू शकली नाही. राहुल गांधींकडून त्यांना अपेक्षा नाही. काँग्रेसमध्ये आता ना दिशा आहे, ना धोरण. म्हणूनच म्हणतो, काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा.

बावनकुळे यांनी पुढे म्हटले, शरद पवारांकडे आता कुणी जायला तयार नाही. उद्धव ठाकरेंना त्यांचीच पार्टी सावरता येत नाही. उलट त्यांच्या लोकांनी आमच्याकडे येताना सांगितलं की ‘वक्फ बोर्डाच्या विधेयकाला विरोध केल्यानं आम्ही पक्ष बदलतोय. बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की, कोणीही काँग्रेस किंवा अन्य पक्षातून भाजपमध्ये यायला तयार असेल, तर त्यांचं स्वागत आहे. पण त्यांच्याआधी विचार होईल. तुम्ही थकून जाल, इतके लोक भाजपकडे येणार आहेत.

Nagpur Police : एका तासात संपवला अपहरणकर्त्याचा खेळ 

महायुतीचं टीमवर्क

महाबळेश्वरच्या एका कार्यक्रमात अजित पवार अनुपस्थित होते. त्यावर बावनकुळे यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं. एक कार्यक्रम चुकला म्हणून लगेच चिंता करू नका. चंद्रकांत पाटील चार कार्यक्रमांना जातात, मी त्यांना सांगतो की ‘जरा मोकळेपणाने, स्वतंत्र कार्यक्रम करा’. या राज्याला पुढे न्यायचं असेल तर एकाच वेळी अनेक ठिकाणी, अनेक हातांनी कामं झाली पाहिजेत. त्यामुळे आम्ही काम वाटून घेतलंय, हे टीमवर्क आहे, टी-20 नव्हे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना बावनकुळे यांनी हास्याचा एक चिमटा घेतला. संजय राऊत काहीही बोलतात, काहीही लिहितात. आता त्यांचं ऐकणं बंद झालंय. पुस्तक त्यांनीच लिहिलं, छापलं आणि आता वाचताहेतही तेच. महाराष्ट्र गंभीर होणार, तर राऊतांनी थोडं हलकं व्हावं, असा टोला त्यांनी लगावला.

बावनकुळे यांचे हे वक्तव्य म्हणजे एकाच वेळी प्रेरणा, इशारा आणि मिशनची हाक आहे. काँग्रेससाठी ही वेळ चिंतेची असली तरी भाजपसाठी ही संधीची साखळी आहे. सध्याच्या राजकीय वाऱ्यांवर नजर टाकली, तर हे स्पष्ट दिसतं. सत्तेच्या खेळात बाजी मारण्यासाठी बावनकुळे यांचा खेळ सुरू झालाय आणि तो थांबण्याची शक्यता जवळपास नाहीच.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!