
पहलगाम इथे झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने कठोर पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानविरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम हाती घेतली आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चिघळला आहे. सीमारेषेवरची परिस्थिती तापली आहे. युद्धसदृश वातावरण निर्माण झालं आहे. भारताकडून दहशतवाद्यांविरोधात मोठ्या कारवाईचे संकेत मिळत होते. मात्र अखेर मध्यरात्री त्याची अंमलबजावणी झाली. केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्टवर ठेवून, 7 मे रोजी देशभर मॉक ड्रिल आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन, ब्लॅकआउट कसा करावा, आणि सुरक्षित ठिकाणी नागरिकांनी कसे जावे याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकारनेही केंद्राच्या आदेशाची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय बैठकांची मालिका सुरू केली आहे. प्रशासनाच्या सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरोधात आणखी एक मोठे पाऊल उचलेले आहेत. भारताच्या हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास एक धडक मोहिम राबवली. ऑपरेशन सिंदूर. यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणांवर अचूक एअर स्ट्राईक करण्यात आला.

नियंत्रण रेषेवर गोळीबार
जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन, आणि लष्कर-ए-तोयबाचे ट्रेनिंग कॅम्प्स उद्ध्वस्त करण्यात आले. विशेष म्हणजे, या कारवाईत केवळ दहशतवादी केंद्रांना लक्ष्य करण्यात आलं. पाकिस्तानच्या लष्करी तळांना किंवा सामान्य नागरिकांना कोणतीही इजा झाली नाही. या स्ट्राईकमध्ये बहावलपूर, कोटली, आणि मुझफ्फराबाद येथील दहशतवादी कॅम्प्सचा समावेश होता. बहावलपूरमधील जैश चे मुख्यालयही नेस्तनाबूत करण्यात आलं. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी लष्कर, नौदल आणि हवाई दल संयुक्तरीत्या ही कारवाई केली.
भारताच्या आक्रमक मोहिमेनंतर पाकिस्तानने बिथरलेली प्रतिक्रिया दिली आहे. नियंत्रण रेषेवर अंधाधुंद गोळीबार करत भारतीय नागरिकांना लक्ष्य केलं. या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू झाला आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी त्यांच्या देशात भारताकडून मिसाइल स्ट्राईक झाल्याची कबुली दिली आहे. पाकिस्तानच्या लष्कराने सांगितले की 6 ठिकाणी 24 क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहे. 8 लोक मृत आणि 33 जखमी झाले आहेत.भारतात सर्वत्र हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
Parinay Fuke : आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे स्वप्न साकार
अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा
केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना 7 मे रोजी मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिले आहेत. या मॉक ड्रीलमध्ये नागरी संरक्षणाचे धडे दिले जातील. हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवले जातील, ब्लॅकआउट कसा करायचा, सुरक्षित जागा कशी शोधायची आणि आपत्कालीन परिस्थितीत कशी वागावं, याचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे. भारताच्या कारवाईनंतर जागतिक पातळीवरही हालचालींना वेग आला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. प्रत्युत्तर देऊ नका. अमेरिकेने भारताच्या दहशतवादविरोधी कारवाईला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे.