
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अंतर्गत उलथापालथ सुरु आहे. ज्यात ठाकरे कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांची एकत्र येण्याची चर्चा जोरात आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यामुळे या चर्चांना नवीन वळण मिळालं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अंतर्गत उलथापालथ सुरू आहे. दोन वर्षांपूर्वीच्या घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र येणार का, या चर्चांना वेग आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील का, हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन वेगवेगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये असलेले अंतर कमी होणार का, याची उत्सुकता वाढली आहे. नुकत्याच एका पत्रकार परिषदेत अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलेले सूचक विधान या चर्चांना अधिकच खवळवणारे ठरले आहे.
सध्या गोंदिया दौऱ्यावर असलेले प्रफुल्ल पटेल पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले, असे महत्त्वाचे निर्णय प्रेससमोर घ्यायचे नसतात. त्यांचे हे वाक्य म्हणजे एक स्फोटक संकेत असल्याचं अनेकांनी सांगितलं. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना नवा आयाम मिळाला आहे. या वक्तव्यानंतर अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, नेमकं काय शिजतंय राष्ट्रवादीच्या स्वयंपाकघरात? कारण गेल्या काही दिवसांमध्ये सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी दोन्ही गट एकत्र येण्याच्या विचाराला दुजोरा दिला आहे.

तणावाची स्थिती
पुढे बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी सध्याच्या देशातील परिस्थितीवर भाष्य केले. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती आहे. अशा वेळी पक्ष एकत्र येण्याची चर्चा करणे गौण आहे. देशहितासाठी एकत्र येणे हेच सध्या आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या भूमिकेने संकेत दिला की राष्ट्रवादीतील अंतर्गत चर्चा फारच प्रगतीपथावर असाव्यात, पण त्यांचा प्राथमिक फोकस सध्या राष्ट्रीय सुरक्षेवर आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊत यांच्या एका वक्तव्यावरही थेट प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानसोबतच्या युद्धाबाबत सरकारवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राऊतांना उत्तर देताना पटेल म्हणाले, ज्यांना आंतरराष्ट्रीय राजकारण काय असतं, हेच माहिती नाही, अशा चिल्लर राजकारण करणाऱ्यांबद्दल बोलणे मला योग्य वाटत नाही.
Suresh Dwadashiwar : एकाच अधिकाऱ्याच्या कार्यकाळात तीन दहशतवादी हल्ले
शरद पवारांनी या पार्श्वभूमीवर यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील. रोहित पवारांनीदेखील ट्विट करत दोन्ही गटांनी एकत्र यावं, अशी इच्छा बोलून दाखवली होती. हे सर्व पाहता, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुन्हा एकत्र येणे हे केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता, प्रत्यक्षात उतरू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एकत्र येणं हे महत्त्वाचं की केवळ राजकीय डावपेच?