
नागपूरच्या मातीला आज मोटाभाईंचा उर्जावान स्पर्श लाभला. स्वस्ती निवासाच्या भूमिपूजनात अमित शाह यांनी केवळ कार्यक्रम नव्हे, तर सेवाभावाला साक्ष दिली.
कर्करोगाविरोधात लढा देण्यासाठी नागपूरमध्ये एक नवा अध्याय सुरू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कॅन्सर इंस्टीट्यूटच्या ‘स्वस्ती निवास’ या अभिनव उपक्रमाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. हा केवळ एका इमारतीचा आरंभ नव्हता, तर समाजातील गरजू, गरीब आणि कर्करोगाशी झुंजणाऱ्या कुटुंबांसाठी आशेचा नवा किरण होता.
या प्रसंगी केंद्रीय गृहमंत्र्यांनी मनापासून भावना व्यक्त करताना सांगितले की, मी अनेक संस्था पाहिल्या, अनेकांचा सदस्यही राहिलो, पण नागपूरचे हे कॅन्सर इंस्टीट्यूट भविष्यात देशभरात नाव कमावेल, यात शंका नाही. यामागील कारण त्यांनी स्पष्ट करताना सांगितले की, ज्या संस्थांच्या पाठीशी समाजासाठी झटणारे, मनस्वी आणि सेवाभावी लोक उभे असतात. त्याच संस्था खऱ्या अर्थाने चालतात आणि लोकांच्या जीवनात बदल घडवतात.

मनापासून स्वीकार
अमित शहा म्हणाले की, पूर्वी मणिपूरमधील परिस्थितीमुळे मी येऊ शकलो नव्हतो. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा आमंत्रण दिल्यावर मी तत्काळ येण्याचा निर्णय घेतला. मी त्यांना शब्द दिला होता की पुढच्या कार्यक्रमाला येईन, आणि मी तो शब्द पाळला. त्यांनी फडणवीस व शैलेश लोधा यांच्या कार्याची भरभरून स्तुती करत म्हटले, ज्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कॅन्सरसारख्या आजाराचे दुःख अनुभवले आहे, अशा व्यक्तींनी ते दुःख सेवा-संकल्पात रूपांतरित केले, ही गोष्ट खरोखर प्रेरणादायी आहे. आज त्यांच्या प्रयत्नांचे बीज एका वटवृक्षात रूपांतरित झाले आहे.
गृहमंत्र्यांनी भारतीय रुग्णालय व्यवस्थेची तुलना पाश्चिमात्य देशांशी करताना अत्यंत सूचक निरीक्षण मांडले. आपल्याकडे रुग्ण फक्त एकटा येत नाही, तर त्याचं संपूर्ण कुटुंब त्याच्यासोबत असतं. हीच आपली सांस्कृतिक ताकद आहे. पण बेडअभावी अनेकदा रुग्णांना नाकारावे लागते. यावर उपाय म्हणून ‘स्वस्ती निवास’ संकल्पनेची निर्मिती झाली आहे, असे ते म्हणाले. ‘स्वस्ती निवास’ ही सुविधा अशा रुग्ण कुटुंबांसाठी आहे जिथे ते अत्यंत स्वस्त दरात राहू शकतात, जेवण मिळू शकते आणि रुग्णाबरोबर असू शकतात. हे केवळ निवासस्थान नाही, तर मानवतेचा नवा अध्याय आहे, असे ते म्हणाले.
कर्करोग चिंता
अमित शहा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी कार्य करणाऱ्या आबाजी थत्ते यांचेही स्मरण करत त्यांच्या सेवाभावाला आदरांजली अर्पण केली. मी त्यांच्या सोबत तीन दिवस प्रवास केला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा आज या कॅन्सर इंस्टीट्यूटच्या स्थापनेत दिसून येते. अमित शहा यांनी भारतात ओरल आणि सर्वायकल कॅन्सरचे वाढते प्रमाण अधोरेखित करत सांगितले की, प्रत्येक आठव्या मिनिटाला एक महिला सर्वायकल कॅन्सरमुळे प्राण गमावते. ही चिंतेची बाब आहे. पण आता कॅन्सरच्या उपचारपद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत. या इन्स्टिट्यूटमध्ये केमोथेरपीसारख्या अत्याधुनिक सुविधा गरजूंना मिळणार आहेत. ते म्हणाले, मी आज येथे जे रुग्ण पाहिले, त्यात बहुसंख्य गरीब व मध्यमवर्गीय होते. त्यांच्यासाठी ही सेवा अमूल्य आहे.
Devendra Fadnavis : शासकीय व्यवस्थेचा रिबूट, डिजिटल क्रांतीचा आराखडा
क्रांतिकारक पावले
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आरोग्य धोरणांवरही प्रकाश टाकला. “पूर्वी महागडे उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. पण आता आयुष्मान भारत योजनेमुळे 60 कोटी गरिबांना 5 लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत मिळतो. याशिवाय स्वस्त दरात औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले, “2014 मध्ये देशात केवळ सात एम्स होते. आज मोदी सरकारने 23 एम्सला मान्यता दिली आहे. आरोग्याचे बजेट 37 हजार कोटींवरून आता 1.35 लाख कोटींवर नेले आहे.
आपल्या भाषणाच्या शेवटी अमित शहा यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत म्हटले, काँग्रेसचे नेते जेव्हा फिरतात, तेव्हा काहीही बोलतात. पण जेव्हा मी आकडे सांगतो, तेव्हा त्यांना ते खटकते. वास्तविक पाहता, त्यांनी दशकानुदशके आरोग्य क्षेत्राकडे दुर्लक्ष केले. नागपूरच्या भूमीतून देशभरातील कर्करोग रुग्णांसाठी नव्या आशेचा दीप प्रज्वलित झाला आहे. ‘स्वस्ती निवास’ ही संकल्पना आरोग्य सेवेच्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा मिलाफ ठरणार आहे.