
आधीच विकासाच्या उंबरठ्यावर थांबलेलं अकोला, आता पावसाच्या कहराने पूर्णतः ढवळून निघालं आहे. या संकटाच्या काळात आमदार रणधीर सावरकर प्रशासनाला जागं करत आहेत.
विदर्भातील अकोला जिल्हा जिथे अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतो, तिथे आता सततच्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शहरातील रस्ते, घरं, शाळा, दुकाने जलमय केली आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः कांदा व केळी उत्पादक शेतकरी पूर्णतः कोलमडले असून त्यांच्या जीवनात संकटांचा डोंगर कोसळला आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे आमदार रणधीर सावरकर यांनी 27 मे मंगळवारी रात्री साडेदहा वाजता अकोल्यात दाखल होताच तातडीने प्रत्यक्ष पाहणी मोहीम सुरू केली. राजराजेश्वर नगरीमध्ये आगमन होताच त्यांनी रात्रीच अनेक भागांना भेटी देऊन नागरिकांच्या व्यथा ऐकल्या आणि प्रशासनाला स्पष्टपणे सुनावले, ताबडतोब पंचनामे करा, शेतकऱ्यांना दिलासा द्या.

रस्ते जलमय, नागरिकांची धांदल
अकोला शहरासह ग्रामीण भागांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे संसार उध्वस्त होत आहेत. बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. अनेक ठिकाणी वाहतूक कोलमडली आहे. रस्त्यांवरील खड्डे पावसात अधिकच खोल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संत गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि महानगरपालिकेला संयुक्तपणे रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजवण्याचे आदेश सावरकर यांनी दिले.
पावसामुळे कांदा आणि केळीच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून सावरकर यांनी कृषी विभागाला आणि जिल्हा प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. ताबडतोब सर्वे करा, पंचनामे करून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवा. त्याचबरोबर व्यापाऱ्यांचे झालेलं नुकसान, घरातील साहित्याचं नुकसान, जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहता, सामान्य नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे, अशी ठाम भूमिका आमदारांनी मांडली.
Akola : पावसाच्या तडाख्यात अडकलं शहर, प्रशासनाच्या छत्रीला छिद्र
कामाला लावलं
पावसामुळे कोसळलेली झाडं, तुटलेल्या विद्युत वाहिन्या आणि बंद पंप ह्यामुळे अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यावर सावरकर यांनी वीज वितरण कंपनी आणि मनपा अधिकाऱ्यांना सक्त सूचना देत काम वेगाने सुरू करण्याचे आदेश दिले. भाजपा लोकप्रतिनिधींनी सकाळपासून शहरात विविध भागांची पाहणी करून प्रत्यक्ष कामात झोकून दिलं.
अकोला हे अजूनही मूलभूत विकासापासून वंचित आहे. अशा वेळी जर पावसाने दाणादाण उडवली आणि प्रशासन वेळेत पावलं उचलत नसेल, तर जनता कुणाकडे पाहणार?” असा प्रश्न उपस्थित करत आमदार सावरकर यांनी प्रशासनाला सजग होण्याचा स्पष्ट इशारा दिला. अकोल्यात सध्या पावसाचा कहर सुरू असून, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि शेतकरी यांचे आयुष्य खडतर बनले आहे. अशा संकटात लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन प्रत्यक्ष मैदानात उतरल्याने लोकांना दिलासा मिळत असला, तरी प्रशासनाचा गतीशील प्रतिसाद हाच खरी गरज आहे.