
महाविकास आघाडीत अंतर्गत वाद भडकले असल्याचे चित्र राज्याच्या राजकारणात दिसून येत आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने राहुल गांधींवर केलेल्या टीकेनंतर काँग्रेसच्या युवा नेत्यानेही सारखा सूर धरला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. राहुल गांधी यांच्या नाशिक दौऱ्यानंतर महाविकास आघाडीत नव्या वादळाची चाहूल लागली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आणि नाशिकचे उपमहानगरप्रमुख बाळा दराडे यांनी राहुल गांधींवर वादग्रस्त विधान करून वातावरण चांगलंच तापवलं. सावरकर आणि हिंदुत्वाचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा ठाकरे गटाच्या नेत्यांकडून देण्यात आला आणि त्यावर काँग्रेसनेही जोरदार टीका केली. आता काँग्रेसमधीलच एका युवा नेत्यानं, अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनीच राहुल गांधींवर केलेल्या टीकेमुळे राजकीय रंगत अधिकच वाढली आहे.
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी यावर तांबेंना थेट चॅलेंज देत परखड भाषेत उत्तर दिलं आहे. सत्यजित तांबे यांनी एका मुलाखतीत काँग्रेसचं भविष्य ठोस असलं तरी नेतृत्वाबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की, राहुल गांधी सहज उपलब्ध होत नाहीत. ही टीका काँग्रेसच्या आतील असंतोष दर्शवणारी होती. त्यांच्या या विधानाने काँग्रेसमध्येच खळबळ उडाली आहे. पक्षश्रेष्ठींवर केलेल्या या थेट टिप्पणीमुळे अनेक ज्येष्ठ नेते तांबेंवर नाराज झाले. त्यावरून यशोमती ठाकूर यांनी आपल्या ठसक्यात प्रत्युत्तर देत तांबेंना मोदींच्या भेटीचं चॅलेंजचं दिलं आहे.

गांधींवर द्विधा मतं
सत्यजित तांबे, जर तुम्हाला इतकीच गरज वाटत असेल तर मोदींना फोन लावून बघा, एक तासात अपॉइंटमेंट मिळते का ते बघा, असं म्हणत त्यांनी तांबेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. राहुल गांधी यांच्यावर अॅक्सेसबिलिटीबाबत केलेल्या आरोपाला उत्तर देताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, राहुल गांधी हे नेहमी सामान्य जनतेमध्ये मिसळतात, भेटतात आणि संवाद साधतात. प्रत्येक पक्षाचा एक प्रोटोकॉल असतो, तो पाळावा लागतो. ज्यांनी पक्ष सोडायचा विचार केला, त्यांना पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी तांबेंवर आणखी टीका करत म्हटलं की, तुम्ही आज अपक्ष आहात, तरीही काँग्रेसच्या नावावर टीका करता.
तुम्ही आमच्या विचारधारेपासून दूर गेला आहात, तरीही पक्षाचं नाव वापरता हे दुर्दैवी आहे. सावरकर आणि हिंदुत्वाविषयी उद्धव गटाच्या नेत्याने केलेल्या विधानावरूनही यशोमती ठाकूर संतापल्या. कोणीही राहुल गांधींना धमकी देऊ शकत नाही. आम्ही शांततेचे आणि अहिंसेचे पुजारी आहोत, पण हे कलयुग आहे. गरज पडल्यास आम्हालाही कलयुगासारखं वागता येतं, असा इशारा त्यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे गटालाही दिला. दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर सत्यजित तांबे काँग्रेसपासून वेगळे झाले आहेत. वडील सुधीर तांबे यांच्या पाठबळावर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला. काँग्रेसने त्यांना निलंबित केलं असलं, तरी ते स्वतःला अजूनही काँग्रेसचा सदस्य मानतात. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
BJP Vs Congress : अकोल्यात पावसाचा थैमान अन् स्पर्धेची राजकीय ढगफुटी