
अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर भाजप आमदारांनी अजित पवारांविरोधात तक्रारी केल्या, पण शहांनी त्यांना पवारांसारखं काम करण्याचा सल्ला दिला. यावरून राजकीय प्रतिसाद उमटायला सुरुवात झाली आहे.
गेले दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा राज्याच्या राजकीय तापमानात भर घालणारा ठरला आहे. त्यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये झालेल्या सभेमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उघडपणे पाठराखण केली, आणि यामुळे महायुतीतील अंतर्गत कुरबुरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या. काँग्रेसने याचाच आधार घेत भाजपवर चौफेर हल्ला चढवला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अमित शाह यांचा दौरा म्हणजे मला पाहा आणि फुलं वाहा असा राजकीय तमाशा आहे, असा घणाघाती टोला लगावला.
सपकाळ यांनी यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधत, हे फक्त राजकीय कटपुतल्या आहेत, राज्याचे खरे निर्णय दिल्लीतील शाहच घेतात, असे स्पष्ट केले. दरम्यान, भाजपच्या काही आमदारांनी त्यांच्या मुंबई भेटीदरम्यान अमित शहांसमोर अजित पवारांविरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी पवारांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले आणि त्यांच्या कुरघोड्यांवर अंकुश घालण्याची मागणी केली. यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आक्रमक आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.

राजकीय संघर्षाचं चित्र
अजित पवारांची तक्रार करण्याऐवजी त्यांच्यासारखं काम करण्याचा सल्ला खुद्द अमित शहांनी भाजप आमदारांना दिला आहे, असं सूचक वक्तव्य करत मिटकरींनी भाजप आमदारांना शांत राहण्याचा सल्ला दिला. ‘उतावीळपणाने काही होत नाही, दमाने घ्या’ असा सज्जड इशाराही त्यांनी दिला. भाजप आमदारांनी अजित पवारांविरोधात तक्रारीचा पाढा वाचला असताना, अमित शहा यांनी मात्र अनपेक्षितपणे बाजू बदलत त्यांना अजित पवारांसारखं काम करा असा कानमंत्र दिला. तक्रारी करु नका, उलट सर्व मंत्र्यांमागे लागा.
प्रशासनावर दबाव आणा आणि आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा, असं अमित शहा यांनी स्पष्टपणे सांगितले होते. आपल्याला महायुती म्हणून एकत्र राहायचं आहे, अशीही जाणीव त्यांनी आमदारांना करून दिली. मात्र भाजप आमदारांचा आरोप आहे की, अजित पवार भाजप उमेदवारांना कमकुवत करण्यासाठी मुद्दाम पराभूत उमेदवारांना बळ देत आहेत. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे धोरण भाजपसाठी धोकादायक ठरू शकते, असा भाजपचा दावा आहे.
राज्यातील पुढील राजकारण हे या संघर्षाच्या अनुषंगानेच ठरेल, असं स्पष्ट होत आहे. महायुती एकत्र राहील की हे केवळ सत्ता टाकण्याचं नाटक आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.