
पावसाने राज्यात कहर माजवला असताना, सरकार मात्र केवळ घोषणांच्या पाऊसपाणीवरच थांबले आहे. या निष्क्रियतेवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी वीजेसारखी टीका करत थेट सत्ताधाऱ्यांना बांधावर नेऊन उभं केलं आहे.
महाराष्ट्रात पावसाळ्याने या वर्षी विक्राळ रुप धारण केले आहे. राज्यभरात गारपीट, मुसळधार पाऊस आणि अवकाळी ढगांच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. नांगरून ठेवलेली शेतं चिखलात गाडली गेली आहेत. पुणे-मुंबईसारखी महानगरेही पुरात वाहू लागली आहेत. अशा संकटाच्या छायेत असताना सत्ताधाऱ्यांचा ‘असून नसल्यासारखा’ वावर नागरिकांच्या जिव्हारी लागला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर घणाघाती टीका करत जनतेच्या वेदना प्रकट केल्या.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात पावसाच्या संकटाने शेतकरी उध्वस्त झाला आहे. पण तरीही सरकारच्या कोणत्याही मंत्र्याला, आमदाराला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या वेदना ऐकण्याची फुरसत नाही. हे लोक केवळ खुर्ची, सत्ता आणि राजकारणासाठीच जिवंत आहेत. त्यांना शेतकऱ्यांचं दुःख दिसतच नाही, असा घणाघात त्यांनी केला.

Yavatmal : महावितरणच्या नियमभंगासाठी अभियंत्याला निलंबनाचा शॉक
मदतीची गरज
वडेट्टीवार पुढे म्हणाले, मी स्वतः विखे पाटलांना काल पाहिलं, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन स्थितीचा आढावा घ्यायला हवा होता. मी एनडीआरएफचा मंत्री होतो. मला माहिती आहे की, अवकाळी पावसाचं नुकसान त्या निकषात बसत नाही. पण राज्य सरकारकडे एचडीआरएफसारखी पर्यायी यंत्रणा आहे. त्याअंतर्गत तरी शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी.
वडेट्टीवार यांनी थेट इशाराच दिला की, सरकार केवळ ‘हे करू’, ‘ते पाहतो’ असे जुजबी आश्वासने देत बसू नये. जर वेळेत ठोस मदत केली नाही, तर शेतकरी तुमचं राजकीय अस्तित्व उखडून टाकतील. नगरपंचायतीच्या निवडणुकीत याचे परिणाम दिसतील. नगरपंचायतीच्या निवडणुकीत तुम्हाला शेतकरी बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाहीत, असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला. पुढे बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली. शेतकरी उध्वस्त झाला आहे. धान उत्पादकांच्या हातात काहीच उरलेलं नाही. पंचनामे थातुरमातुर आणि फार्सवजा होत आहेत. रग्बी क्षेत्रातील धान उत्पादक अजूनही खरेदी केंद्रांची वाट पाहत आहेत. सरकार काहीच करत नाही.
National Security : पाकिस्तानातून परतलेली महिला नागपूर पोलिसांच्या ताब्यात
मतं मिळविण्याचा हेतू
त्यांनी मुंबईतील परिस्थितीवरही बोट ठेवले. मुंबईतील पावसाने मेट्रोची लक्तरं वेशीवर टांगली. उद्घाटन झालेली मेट्रो गळायला लागली. सगळं काम बोगस आहे. हे सरकार म्हणजे अस्तित्वातच नसल्यासारखं आहे, अशी जहाल टीका त्यांनी केली. वडेट्टीवार म्हणाले, सरकार सतत धार्मिक ध्रुवीकरण करत राहतं. हिंदू-मुस्लिम करून मते मिळवण्याचा एकमेव हेतू आहे. पण लोकांच्या मूलभूत गरजा, पिकांचं नुकसान, पाण्याचं नियोजन, पूरस्थिती याकडे सरकारचं काहीही लक्ष नाही.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत भावावरही वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली. “धानाच्या दरात फक्त 69 रुपयांची वाढ करून 2369 रुपये इतका दर जाहीर केला आहे. प्रत्यक्षात 3000 रुपयांचा दर अपेक्षित होता. पूर्व विदर्भातील 22 जिल्ह्यांमध्ये शेतकरी धान पिकवतात, आणि मेपासूनच त्याची तयारी सुरू होते. जमीन वखरणीपासून ते कापणीपर्यंत शेतकरी लाखोंचा खर्च करतो. पण सरकारने दिलेली वाढ म्हणजे त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखी आहे,” असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
गंभीर सवाल
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “मी तिच्या कुटुंबाला भेटून आलो. त्यांनी दाखवलेले फोटो पाहिले. तिच्या अंगावर गंभीर जखमा होत्या. आता आरोपीला वाचवण्यासाठी तिच्या चारित्र्यावर शंका घेण्याचा प्रयत्न चालू आहे, हे अत्यंत लाजिरवाणं आहे. वकिलांची भूमिका थोडी तरी सत्याकडे झुकणारी असावी, अशी अपेक्षा आहे. सत्यजित तांबे यांच्या भूमिकेबद्दल विचारल्यावर वडेट्टीवार म्हणाले, सत्यजितने सत्य बोलणं सोडलं म्हणजे तो असत्याच्या बाजूने गेला. आम्हाला त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. राहुल गांधी सगळ्यांना भेटत असतात. त्यामुळे प्रत्येकजण उठसूट भेटी मागत बसू नये. आम्ही नुकतेच त्यांना भेटून आलो आहोत.